प्रसारमाध्यम / दिग्विजय माळकर
राज्यातील विदर्भ भागात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, गुरुवारी हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४६.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मुंबईत तापमान तुलनेने कमी असले तरी उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
मुंबईचे गुरुवारी कमाल तापमान ३५ अंश तर किमान तापमान २९ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून हवामान उष्ण आणि दमट राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील मान्सूनपूर्व सरींचा जोर सध्या कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दक्षिण भारतात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सलग पावसामुळे अनेक भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या हवामान प्रणालींमुळे देशभरातील हवामानात पुढील काही दिवसांत मोठा बदल होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हवामान विभागानुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, लक्षद्वीप परिसर, पूर्व-मध्य बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान समुद्र आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये पुढे सरकला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
गुरुवारी विदर्भातील वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शुक्रवारी अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली






