दारवाड : शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची जोड मिळावी आणि उत्पादनवाढीसाठी अत्याधुनिक कृषी उपकरणांचा वापर वाढावा या उद्देशाने स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेतर्फे सीएसआर निधीच्या माध्यमातून दारवाड, म्हसवे, मोरेवाडी आणि पंडीवरे येथील हजारो शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंपांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
सीएसआर निधीच्या माध्यमातून शेतकरी, ग्रामीण युवक आणि महिलांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यास संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात शेती, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासासाठी आणखी अनेक लोकहितकारी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमास प्रकाश पाटील, विश्वजीत पाटील, राहुल पाटील, आकाश पाटील, प्रवीण देसाई, शशिकांत खापरे, संदीप देसाई, सुशांत पाटील, प्रशांत येडूरे, संतोष देसाई आणि विजय गुजर यांच्यासह ग्रामस्थ व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा योजनांची अपेक्षा व्यक्त केली.






