Kolhapur residents will get flights to Mumbai twice a day
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं करवीर नगरी कोल्हापूर शहर आता अधिक वेगाने महानगरांशी जोडले जाणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने कोल्हापूर-मुंबई दरम्यान दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सकाळी लवकर मुंबईला जाऊन काम आटोपून रात्री परत येणे शक्य होणार आहे.
ही सेवा येत्या ११ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता असून, कोल्हापूरकरांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे. कोल्हापूर-मुंबई हवाईमार्ग हा ‘उडान’ योजनेअंतर्गत येतो. त्यामुळे आतापर्यंत केवळ एकच विमान कंपनी सेवा देत होती. मात्र, सप्टेंबरमध्ये या योजनेची मुदत संपल्यानंतर हा मार्ग इतर विमान कंपन्यांसाठी खुला झाला आहे. त्यानंतर इंडिगोला कोल्हापूर-मुंबईसाठी मंजुरी मिळाली आहे.
कोल्हापूर-मुंबई फ्लाईटचं संभाव्य वेळापत्रक
मुंबई-कोल्हापूर ( सकाळी ) : पहाटे ६.०५ ला मुंबईहून टेकऑफ, सकाळी ७.०० ला कोल्हापूरला आगमन
कोल्हापूर-मुंबई ( सकाळी ) : सकाळी ७.३५ ला कोल्हापूरहून टेकऑफ, सकाळी ८.३० ला मुंबईला आगमन
मुंबई-कोल्हापूर ( रात्री ) : रात्री ७.१० ला नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ, रात्री ८.०५ ला कोल्हापूर आगमन
कोल्हापूर-मुंबई ( रात्री ) : रात्री ८.३५ ला कोल्हापूरहून टेकऑफ, रात्री ९.३५ ला मुंबई आगमन
या दोन फ्लाईट्समुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असून, व्यापारी, उद्योगपती आणि पर्यटन क्षेत्राला देखील मोठा फायदा होईल.
सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवाही लवकरच
कोल्हापूरनंतर आता सोलापूर शहरही हवाई दृष्ट्या मजबूत होणार आहे. सोलापूर-पुणे-मुंबई विमान सेवेसाठी केंद्र सरकारने तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही सेवा देखील ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू होणार आहे.
पहिल्या वर्षी या विमानसेवेसाठी तिकिटांवर १०० टक्के आर्थिक मदत मिळणार असून, प्रवाशांना सुमारे ३,२०० रुपयांपर्यंत तिकिट उपलब्ध असण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूरकरांना थेट राज्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी दळणवळण साधता येईल. कोल्हापूर व सोलापूर या दोन्ही शहरांसाठी या नव्या उड्डाण सेवेमुळे रोजगार, गुंतवणूक आणि पर्यटनाच्या संधींना मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.