अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज पासून सुरु

0
201
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी प्रवेशासाठीचा अर्ज आज पासून- २६ मे  भरता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जून असेल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

राज्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील साधारण १२ लाख विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार नोंदणी प्रक्रिया २१ मे रोजी सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे वेबसाइट ठप्प झाली होती. शिक्षण विभागाच्या सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना २६ मे ते १० जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अर्ज भरावा लागेल. त्यानंतर पाच जूनला तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीवर आक्षेप किंवा हरकती विद्यार्थ्यांना सहा ते सात जून या कालावधीत नोंदवता येतील. त्यानंतर आठ जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

शून्य फेरीत ९ ते ११ जून या कालावधीत व्यवस्थापन कोटा, संस्थांतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा अशा कोट्यांतर्गत प्रवेश होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करून, शुल्क भरून प्रवेश निश्चित करावेत, असे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ११ ते १८ जून या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहेत. त्यानंतर २० जूनला दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

केंद्रीय अकरावी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केल्यानंतर, विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ आणि भाग २ भरायचा आहे. भाग १ मध्ये विद्यार्थ्याची सर्वसाधारण माहिती भरल्यानंतर, भाग २ मध्ये कॉलेजांचे पर्याय भरायचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कटऑफ गुणांचा अभ्यास करून, कॉलेजांचे पर्याय भरायचे आहेत. कॉलेज ॲलॉटमेंटमध्ये पर्याय क्रमांक १ चे कॉलेज जाहीर झाल्यावर, तेथे प्रवेश घेणे अनिवार्य राहणार आहे. प्रवेश न घेतल्यास, विद्यार्थ्याला पुढच्या फेरीस सहभागी होता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरणे गरजेचे आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here