
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी कोल्हापुरात काँग्रेसतर्फे सद्भावना दौड काढण्यात आली. यंदा ही दौड दिवंगत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या वारसांकडून न होता थेट विद्यमान जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यामुळे या खांदेपालटीची राजकीय चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
दरवर्षी पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सद्भावना दौड आयोजित केली जात असे. मात्र यंदा त्यांचे सुपुत्र राहुल पाटील आणि भाऊ राजेश पाटील यांच्या अजित पवार गटात प्रवेशाच्या घडामोडींमुळे ही जबाबदारी काँग्रेसकडे आली.
राजर्षी शाहू समाधी स्थळापासून या दौडीला सुरुवात झाली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी ज्योत प्रज्वलित करून दौडीचे उद्घाटन केले. “अमर रहे अमर रहे, राजीवजी गांधी अमर रहे” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही दौड सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, वटेश्वर महादेव मंदिर मार्गे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील राजीव गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत निघाली. तेथे पुष्पहार अर्पण करून गांधींना अभिवादन करण्यात आले.






