The Maharashtra Government has decided to make the e-KYC process mandatory for the 'Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana'.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ साठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात ही योजना निर्णायक ठरली होती. महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाणारी ही योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे.
या योजनेबाबत सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देत ही प्रक्रिया सुरू केली जात आहे आणि येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व पात्र महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
महत्त्वाची माहिती अपलोड करा : नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
आधार क्रमांक नोंदवा : लाभार्थी आधार क्रमांक पेजवर नोंदवावा.
कॅप्चा कोड आणि प्रमाणीकरण : कॅप्चा कोड अचूक नोंदवा आणि आधार प्रमाणीकरणासाठी ‘मी सहमत आहे’ पर्याय निवडा.
ओटीपी प्रमाणीकरण : आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी नोंदवा आणि प्रक्रिया पूर्ण करा.
सध्या तांत्रिक कारणांमुळे पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली नाही, मात्र शासनाने लवकरच ती उपलब्ध होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळोवेळी वेबसाइट तपासत राहावे आणि प्रक्रिया सुरू होताच तातडीने पूर्ण करावी.
या प्रक्रियेमुळे योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचेल आणि गैरपात्र व्यक्तींना वगळले जाईल. यामुळे योजना अधिक पारदर्शक होईल व महिलांना होणारा लाभ सुनिश्चित केला जाईल.सरकारच्या याच निर्णयामुळे आता लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य झाले आहे, अन्यथा ₹१,५००/- मासिक लाभ भविष्यात थांबवला जाऊ शकतो.