कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
ऊसाला प्रति टन ५ हजार रुपये एकरकमी दर, रिकवरीचा बेस पुन्हा ९.५ टक्के करणे, दुय्यम उपपदार्थातील उत्पन्नाचा शेतकऱ्यांना वाटा, साखरेची किमान विक्री किंमत ४५ रुपये किलो करणे, तसेच तोडणी वाहतूक यंत्रणेकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविणे या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा प्रणित ऊस उत्पादक महासंघ गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी ऊस परिषद घेणार आहे.
परिषद ठिकाण – सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेतृत्वाचा सहभाग
या परिषदेला किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय सचिव विजू कृष्णन, अखिल भारतीय ऊस उत्पादक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तामिळनाडूचे डी. रवींद्रन, किसान सभा राज्य सचिव डॉ. अजित नवले, तसेच उमेश देशमुख आदी मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.
मांडण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्या
-
ऊसाला प्रति टन एकरकमी ५ हजार रुपये दर द्या
-
रिकव्हरी बेस पुन्हा ९.५ टक्के ठरवा
-
दुय्यम उपपदार्थातील उत्पन्नाचा शेतकऱ्यांना वाटा, त्यासाठी कायद्यात सुधारणा
-
साखरेसाठी घरगुती व औद्योगिक अशी दुहेरी दर प्रणाली सुरू करा
-
साखरेची किमान विक्री किंमत ४५ रुपये किलो करा
-
तोडणी–वाहतूक यंत्रणेकडून होणारी लूट थांबविण्यासाठी नियंत्रण
-
एक सप्टेंबरपूर्वी गावात सार्वजनिक ठिकाणी क्रमपाळी प्रसिद्ध करणे
-
वजन काट्यांमध्ये पारदर्शकता
-
राजकारण न करता सर्व सहकारी साखर कारखान्यांना कर्ज थकहमी द्या
-
जिल्ह्यातील ऊस शेती उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा
ऊस उत्पादकतेतील अडचणी
किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उदय नारकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ऊस उत्पादकता व साखरेचा उतारा अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. त्यामागे हंगामनिहाय ऊस लागवडीखालील क्षेत्राचे असमतोल नियोजन, पकतेनुसार ऊस जातींच्या तोडणीचा अभाव, सुधारित जातींच्या लागवडीचे अपुरे नियोजन, शुद्ध व निरोगी ऊस बेणे पुरवठ्यासाठी त्रिस्तरीय बेणेमळ्यांचा अभाव, तसेच पाण्याचे अयोग्य नियोजन ही मुख्य कारणे आहेत.
परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी
ऊस परिषदेचे स्वागताध्यक्ष भाई बाबासाहेब देवकर, तसेच प्राचार्य ए. बी. पाटील, प्रा. सुभाष जाधव, ॲड. अमोल नाईक यांनी परिषदेची भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
पत्रकार परिषदेस लक्ष्मण पाच्छापुरे, चंद्रकांत कुरणे, युवराज भोसले, बाबासाहेब खाडे, चव्हाण, विवेकानंद गोडसे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
——————————————————————————————–



