The time for entry into the ministry has now been changed.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मंत्रालयात प्रवेशासाठी असलेली वेळ आता बदलण्यात आली आहे. यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना दुपारी दोन नंतर प्रवेश दिला जात होता. मात्र, मोठ्या रांगा, नागरिकांची होणारी गैरसोय आणि वेळेचा अपव्यय लक्षात घेऊन सरकारने नवा शासन निर्णय जारी केला आहे.
नवीन निर्णयानुसार, सर्वसामान्य नागरिकांना आता दुपारी १२ वाजल्या पासून मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागतांना देखील दुपारी १२ पासून प्रवेशाची मुभा असेल, तर दुपारी २ नंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी संबंधित वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहील.
तसेच, वकील व त्यांच्यासोबतचे न्यायालयीन लिपिक यांना विविध विभागातील अपील व इतर न्यायालयीन कामकाजासाठी वैध दस्तऐवज तपासून सकाळी १० नंतर प्रवेश दिला जाईल.
मंत्रालयात प्रवेशासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यांसारखी शासनमान्य ओळखपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. तसेच, अभ्यागतांनी वेळोवेळी लागू करण्यात आलेल्या सर्व नियम, अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे.
या निर्णयामुळे दुपारी दोन नंतरची गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच दोन तास आधी प्रवेश मिळाल्याने सर्वसामान्यांना वेळेची बचत होईल आणि कामकाज अधिक सुकर होईल. राज्यभरातून मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना हा निर्णय दिलासा देणारा ठरणार असून, या बदलाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे.