कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सर्वजण सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ पर्यटक, महाबळेश्वर येथील काही पर्यटकांचा समावेश असून, उर्वरित ४० पर्यटक हे महाराष्ट्राच्या इतर विविध जिल्ह्यांतील आहेत.
अलिकडच्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती व भूस्खलन होत होते. मात्र काल धराली गावात झालेलेली ढगफुटी आणि त्यानंतर झालेले भूस्कलन याचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. महाराष्ट्रातील ५१ पर्यटक उत्तरकाशीमध्ये गेले आहेत. परंतु सर्वजण सुखरूप असून, त्यांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके काम करत आहेत, अशी माहिती आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
राज्य सरकारकडून पर्यटकांच्या संपर्कात राहून आवश्यक ती मदत पोहोचवली जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरू असून, परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.