प्रसारमाध्यम I दिग्विजय माळकर
दुबई: मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे गल्फ देशांमध्ये काम करणाऱ्या हजारो फिलिपिनो परदेशी कामगारांवर (OFWs) आर्थिक संकट ओढावले आहे. नोकऱ्या जाणे, पगार बंद होणे आणि व्यवसाय मंदावल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
दुबईमध्ये घरकाम करणारी सिंड्रेला नावाची फिलिपिनो महिला म्हणाली की, “अर्धवेळ कामातून मिळणारे पैसे अपुरे पडत असल्याने अनेकदा दिवसातून एकदाच जेवण करावे लागते.” ती ज्या सिरियन कुटुंबाकडे काम करत होती, त्यांनी सुरक्षेच्या भीतीने यूएई सोडल्याने तिची नोकरी गेली.
युनायटेड अरब अमिरेट्स, कतार, सौदी अरेबियाआणि इतर गल्फ देशांमध्ये सुमारे २४ लाखांहून अधिक फिलिपिनो कामगार कार्यरत आहेत. आरोग्य, हॉटेल, सेवा आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात ते मोठ्या प्रमाणावर काम करतात.
व्यवसाय मंदावले, कर्मचारी कपात वाढली
दोहामधील एका लक्झरी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या किमने सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यवसाय घसरल्याने हॉटेलने सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. फ्रान्स, भारत, नेपाळ, बांगलादेश आणि अरब देशांतील कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला.किम म्हणाली,
Bahrain मध्ये राहणाऱ्या टेरे आणि तिच्या पतीनेही संघर्षामुळे कायमस्वरूपी फिलिपिन्समध्ये परतण्याचा निर्णय घेतला. अनेक प्रकल्प थांबल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
फिलिपिन्सच्या अर्थव्यवस्थेलाही फटका
गल्फ देशांतील फिलिपिनो कामगारांच्या रेमिटन्सवर फिलिपिन्सची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. परदेशातून येणारी रक्कम देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुमारे १० टक्के आहे. त्यामुळे रोजगार गमावलेल्या कामगारांमुळे केवळ कुटुंबांनाच नव्हे, तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेलाही धक्का बसत आहे.
फिलिपिन्स सरकारने आतापर्यंत ९,५०० हून अधिक नागरिकांना विशेष विमानांद्वारे मायदेशी परत आणले आहे. त्यामध्ये यूएई, कुवैत, सौदी अरेबिया, कतार आणि बहरीनमधील कामगारांचा समावेश आहे.
हॅन्स लिओ कॅकडॅक यांनी सांगितले की, परतलेल्या कामगारांना आर्थिक मदत, मानसिक समुपदेशन, व्यवसाय प्रशिक्षण आणि पुनर्वसन सुविधा दिल्या जात आहेत. तसेच मध्यपूर्वेतच राहिलेल्या बेरोजगार कामगारांसाठी एकवेळ २०० डॉलर्सची मदत जाहीर करण्यात आली आहे.
अनेकांना पुन्हा गल्फमध्ये परतण्याची इच्छा
संघर्ष कमी झाल्यानंतर पुन्हा गल्फ देशांमध्ये परत जाऊन काम करण्याची इच्छा अनेक कामगारांनी व्यक्त केली आहे. काहींना अजूनही वैध रोजगार व्हिसा असल्याने परिस्थिती स्थिर झाल्यावर परतण्याची आशा आहे.






