अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव तयारीला वेग

गरुड मंडप उभारणी युद्धपातळीवर

0
159
As the festivities of Ganeshotsav come to an end, preparations for the Sharadiya Navratri festival have gained momentum at the Karveer Niwasini Shri Ambabai Temple.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गणेशोत्सवाची धामधूम आटोपताच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. यंदा नवरात्रोत्सवाच्या काळात सुमारे २० लाखांवर भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने तयारीसाठी सर्वंकष योजना आखून स्वच्छता, देखभाल आणि व्यवस्थापनाच्या कामांना सुरुवात केली आहे.
शिखर रंगरंगोटी आणि स्वच्छतेला प्रारंभ
मंगळवार पासून मंदिराच्या पाचही शिखरांचे घासकाम व रंगरंगोटी सुरू झाली. कालांतराने धूळ, पावसाचे पाणी, शेवाळ व इतर नैसर्गिक अडथळ्यांमुळे मंदिराच्या बाह्य भागावर मळ आणि झाडा-झुडपांची वाढ झाली होती. त्या सर्वांचे साफसफाई करून छतावरील आणि संरक्षण भिंतीवरील वाढलेली झाडे काढून टाकण्यात आली. मंदिराच्या वास्तुशिल्पाचा मूळ देखावा कायम राहावा यासाठी विशेष काळजी घेऊन ही कामे केली जात आहेत.
आज, बुधवार पासून संपूर्ण मंदिर पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ केले जाणार आहे. पुढील आठवडाभर परिसर स्वच्छ ठेवण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, मुख्य मंदिरासोबतच आसपासच्या लहान मंदिरांचीही स्वच्छता केली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेमुळे भाविकांना प्रसन्न आणि सुरक्षित वातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवरात्रोत्सवात देवीचे धार्मिक विधी गरुड मंडपात पार पडतात. त्यासाठी अंबाबाई मंदिर परिसरात गरुड मंडप, नगारखाना आणि मणिकर्णिका कुंडाचे काम वेगाने सुरू आहे. सध्या खांब उभारणी आणि अडक बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून, पुढील आठवड्यात रात्रंदिवस काम करून हा तात्पुरता ढाचा तयार करण्याची तयारी आहे. गरुड मंडप तयार झाल्यानंतर नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांसह धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पडतील.
भाविकांसाठी व्यवस्थापन आणि सुविधा
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने उत्सव काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आवश्यक व्यवस्थापन आखले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि पार्किंग व्यवस्थेसह इतर अनेक बाबींची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि सुरळीत राहावा, यासाठी स्वयंसेवकांसह स्थानिक प्रशासनाचीही मदत घेण्यात येत आहे.

नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजजीवनात एकोपा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्रासह देशभरातील भाविक या काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. देवीचे आकर्षक सजावट, विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम या काळात भाविकांना आत्मिक समाधान देतात. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी करण्यात येणाऱ्या तयारीला विशेष महत्त्व दिले जात आहे.

————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here