बदलत्या काळानुसार ‘वटपौर्णिमा’चे नवे स्वरूप : परंपरेत नवचैतन्याची पालवी

0
474
The tradition of women worshipping the banyan tree on the full moon day of the Jyeshtha month for the long life of their husbands has been going on for many years.
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

महिलांसाठी विशेष महत्त्व असलेले व्रत म्हणजे वटपौर्णिमा. ज्‍येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी वटवृक्षाची पूजा करणे ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. मात्र, आधुनिक काळात या परंपरेला एक नवे रूप लाभत आहे. 

संपूर्णपणे पारंपरिक पद्धती जपत, अनेक ठिकाणी वटपौर्णिमेचा सण पर्यावरणस्नेही व सामाजिक भान जपत साजरा करण्याची नवी दिशा घेतली जात आहे. आता फक्त वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालण्यापुरता हा सण मर्यादित राहिलेला नाही. अनेक महिला आणि सामाजिक संस्था एकत्र येऊन वृक्षारोपण, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आणि पर्यावरण जनजागृती मोहीम राबवत आहेत.

कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातील महिला पर्यावरण संवर्धनासाठी प्रतिकात्मक वडाची पूजा करत आहेत, झाडांची फांदी घरी आणून त्याची पूजा केली जाते तसेच नवीन वडाची झाडे लावून या परंपरेला काळानुरूप अर्थ दिला जात आहे.

काही ठिकाणी पती-पत्नी एकत्र पूजा करतात, जे समभाव आणि एकमेकांच्या कल्याणासाठी समान योगदान देण्याचा नवा विचार पुढे आणते. ही परंपरा आता केवळ स्त्रियांसाठी नसून, समाजासाठीही एक सकारात्मक संदेश घेऊन येत आहे. पर्यावरण रक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि एकमेकांसाठी सद्भावना.

वटपौर्णिमा ही केवळ एक धार्मिक परंपरा न राहता, सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकतेचा एक सण ठरत आहे. ही बदलती रूपेच खरे तर आपली संस्कृती सजीव ठेवतात. 

वडाच्या झाडाची पूजा का करतात ?

पुराणकथे प्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला ! महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला ! त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात. नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून वट पौर्णिमेला वडाच्‍या झाडाची पूजा करतात.

व्रताची देवता

सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे. सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.

वटवृक्षाचे महत्त्व

यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली ; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. ‘या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्त्वस्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते. शक्तिरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावातून हे व्रत केले असता जीव-शिव एकरूपतेची अनुभूती येऊ शकते.

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व

वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.

वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व

वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणार्‍या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.

वडाच्या पूजनामध्ये फळे अर्पण करण्याचे कारण

फळे ही मधुररसाची असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणार्‍या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोशापर्यंत झिरपतात.

————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here