मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास सात महिने उलटून गेले, तरीही अजूनही विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. संसदीय लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी ही बाब मंगळवारी विधानसभेत अत्यंत ठामपणे मांडली.
जाधव यांनी हा मुद्दा मांडताना, राजकीय आकसामुळे विरोधी पक्षनेतेपद रखडले असल्याचा आरोप करत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला होता.
या पार्श्वभूमीवर, आज राज्य विधिमंडळातर्फे आयोजित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळ्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबतचे निवेदन थेट सरन्यायाधीशांना सादर केले. सत्कार समारंभानंतर झालेल्या हस्तांदोलनाच्या वेळेसच त्यांनी हे पत्र सरन्यायाधीश गवई यांच्याकडे सुपूर्द केले.
या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाची सात महिन्यांची रिक्तता ही केवळ राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांना विरोधात जाणारी नसून, लोकशाहीच्या आराखड्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. विरोधी पक्षाच्या तक्रारी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यामुळे या प्रकरणाला न्यायालयीन वळण लागण्याची शक्यता असून, येत्या काळात राजकीय घडामोडींना गती मिळू शकते.
—————————————————————————————–






