कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. याचा फायदा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून घेतला जातो आहे. मोबाईल इंटरनेटच्या झपाट्याने विस्तारल्याने पूर्वी केवळ शहरातील लोकांसाठी मर्यादित असलेली ऑनलाईन खरेदीची सवय आता वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचली असून, ग्रामीण ग्राहकही डिजिटल व्यवहाराशी जोडले जाऊ लागले आहेत. ही बदलती सवय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी नवे दालन उघडत आहे.
पूर्वी गावातील मंडळी मोलमजुरी करून जेमतेम दिवाळीसाठी नवीन कपडे घेण्याची सोय करत होती. आता मात्र मोबाईलच्या एका क्लिकवर घरपोच कपडे, बूट, चप्पल, फ्रीज, टीव्ही, होम थिएटर, औषधे, महिला आभूषणे, साड्या, लहान मुलांचे कपडे अशा अनेक वस्तू गावांमध्ये पोहोचल्या आहेत. त्यातही ‘डिस्काउंट’ असेल तर ग्राहकांची मने जिंकली जातात.
गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांमध्ये ग्राहक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून घरपोच वस्तू मागवत आहेत. मोठ्या कंपन्यांनी दिलेल्या सवलती, जलद वितरण सेवा आणि आकर्षक ऑफर्समुळे ग्राहकांचा कल बदलू लागला आहे.
मात्र, या बदलात केवळ ग्राहक नाही, तर स्थानिक व्यापारी ही आपला व्यवसाय ऑनलाईन आणत आहेत. काही तरुण व्यावसायिकांनी सोशल मीडियावरून माल विक्रीला सुरुवात केली असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
हे चित्र तर नवी संधी दाखवतंय. स्थानिक उत्पादक, कारागीर, दुकानदार जर डिजिटल मार्केटमध्ये पाऊल टाकतील, तर त्यांच्यासाठीही मोठा ग्राहक वर्ग उपलब्ध होऊ शकतो. शासनाकडूनही डिजिटल व्यापारासाठी अनेक प्रशिक्षण आणि सवलतीच्या योजना आहेत.
ग्रामीण भागात आता केवळ शेतमाल नव्हे, तर डिजिटल युगात व्यापार करणारे ‘डिजिटल व्यापारी’ही घडू लागले आहेत. ग्राहकांनी स्थानिक ब्रँड आणि ऑनलाईन स्थानिक उत्पादकांना प्राधान्य दिल्यास, ग्रामीण भागातूनही उद्योजकतेचा नवा वसा पुढे जाईल