कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जून महिन्याची सुरुवात झाली, तरी अजूनही सरकारी अधिकारी-कर्मचारी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सर्वसाधारणपणे मे महिन्यात बदल्या होतात. परंतु, यंदा तुरळक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या वगळता, इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या अजूनही झालेल्या नाहीत.
मे महिन्याच्या अखेरीस राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासन कामात गुंतले असून, त्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांची मुदतवाढ देण्याबाबत सरकार निर्णय घेणार असल्याचे कळते.
बदलीस पात्र असलेले राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत दर वर्षी केल्या जातात. नियमित बदल्यांबरोबरच विनंती बदल्याही यावेळी केल्या जातात. परंतु, या वर्षी आतापर्यंत सरकारी विभागांतील केवळ १५ ते २० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याच बदल्या झाल्याचे चित्र आहे. बदलीस पात्र कर्मचाऱ्यांचे ३१ मेआधी समुपदेशन करून नियुक्तीपत्रे लवकरात लवकर द्यावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या होत्या. राज्य पोलिस दलात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्यात करण्यात आल्या. तसेच, मुंबईतील अंतर्गत बदल्याही नुकत्याच करण्यात आला. मात्र, तरीही राज्य सरकारच्या काही विभागांमध्ये बदल्या अजूनही प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, याविषयी एका सनदी अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बदल्यांना मे महिन्यात सुरुवात झाली होती. परंतु, प्रशासकीय कारणे, मुसळधार पावसामुळे कर्मचारी विविध कामांत गुंतल्याने त्यास काहीसा विलंब झाल्याचे दिसते. परंतु, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बदल्या करण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल असे स्पष्ट केले.