शिरोळ : प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वळीव पावसामुळे शिरोळ तालुक्यात भाजीपाल्याचे मोठं नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शिरोळ तालुक्यात थैमान घातल्याने भाजीपाला तसेच ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये शेतांमध्ये पाणी साचल्याने भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग, वांगी, भेंडी यांसारख्या पिके कुजण्याच्या स्थितीत आली आहेत.
शेतकरी विक्रमसिंह जगदाळे – शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
शेतकऱ्यांनी मशागत, बी-बियाणे, मजुरांवर खर्च करून पिके उभी केली. मात्र, अवकाळी पावसामुळे पाणी साचल्याने ही पिके हातातून निघून जात आहेत.
तालुक्यातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक ओढे,नाले साचलेला गाळ आणि अतिक्रमणामुळे अडथले आल्याने शेतात पाणी निचरा होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
———————————————————————————————-