कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम-किसान पोर्टलवर अनेक नव्या सुविधांची भर घातली आहे. या नव्या बदलांमुळे शेतकऱ्यांची स्व-नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी योजनेत आता अर्ज करताना शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नोंदणी फॉर्म भरताना आता वैवाहिक स्थिती जोडली असून अर्जदाराने स्वतःचे पती, पत्नी अथवा पालकांची माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जमीन संबंधित कागदपत्रे व जमाबंदीची प्रत अपलोड केल्यानंतरच तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर करता येणार आहे. ही माहिती तपासून जिल्हा स्तरावर अंतिम मंजुरीसाठी पाठवली जाईल.
पोर्टलची लॉगिन प्रणालीही अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. लॉगिन करताना आधारशी संलग्न मोबाईल नंबरवर मिळालेल्या ओटीपीद्वारे प्रवेश करता येईल, ज्याची वैधता केवळ ९० सेकंद राहील.
याशिवाय, जर नोंदणीवेळी शेतकऱ्याने चुकीचे राज्य निवडले असेल, तर आता तो स्वतः ‘शेतकरी कॉर्नर’ या विभागात जाऊन ‘राज्य बदल विनंती’ करू शकतो. ही विनंती तहसील आणि जिल्हास्तरावर पडताळल्यानंतर भारत सरकारकडे पाठवली जाईल.
जर अर्ज प्रक्रियेत कुठल्याही टप्प्यावर विनंती नाकारली गेली, तर संबंधित अर्ज कायमस्वरूपी रद्द केला जाईल. तसेच, जर कोणताही अपात्र शेतकरी लाभ घेत असेल, तर त्याच्याकडून रक्कम ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने वसूल केली जाईल.
शेतकरी त्यांच्या नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक वापरून हप्त्यांची माहिती तपासू शकतील. याशिवाय, वसुलीसाठी शेतकरी नेटबँकिंग, कार्ड्स, यूपीआयद्वारे ऑनलाईन पेमेंट करू शकतात. ऑफलाइन पेमेंटसाठी चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे रक्कम ठराविक खात्यात जमा करून तहसील अथवा जिल्हा कार्यालयात पावती सादर करावी लागेल.
या नव्या प्रणालीमुळे योजनेची कार्यपद्धती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि वेगवान होणार असून शेतकऱ्यांचा लाभ अधिक खात्रीशीरपणे पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.
—————————————————————————————–