प्रसारमाध्यम lसुनंदा नाईक
रत्नागिरी /कणकवली ( प्रतिनिधी)
कोकणातील हापूस आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १५ मे रोजी मुंबईत गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आज मा. खा. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
गेल्या काही वर्षांपासून बदलणारे हवामान, वाढता उत्पादन खर्च, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारपेठेतील पडलेले दर यामुळे कोकणचा बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस मदत मिळत नसल्याने आता
थेट मुख्यमंत्र्यांच्या दारात दाद मागण्यासाठी कोकणातील हजारो शेतकरी मुंबईत एकवटणार आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील अल्पभूधारक शेतकरी सातत्याने रास्ता रोको , धडक मोर्चा , एल्गार मेळावा या माध्यामातून आंबा बागायतदार शेतकऱ्यांना भरीव मदत द्या या मागणीसाठी आंदोलने करत आहे. मात्र राज्य सरकारने यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून हेक्टरी २२ हजार रूपयाची तोकडी मदत जाहीर केली आहे. यामुळे संतापलेल्या कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर १५ मे रोजी धडक देणार आहेत.
या आंदोलनात शेतकरी संघटना , बागायतदार संघ , सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी , कोकणस्थित मुंबईकर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. १५ मे रोजी दुपारी ३ वाजता गिरगांव चौपाटी येथून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीकडे हा मोर्चा निघणार आहे. यावेळी बैठकीस मा. आमदार बाळ माने , सुशांत नाईक, गणेश गावकर , प्रशांत शिंदे , किरण टेंभुलकर , काका ढोके यांचेसह आंबा बागायतदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.






