कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महावितरणतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांच्या तक्रारींचे निरसन वेळेत व जलद गतीने होणे आवश्यक आहे. या उद्देशाने शंभर दिवसांच्या विशेष मोहिमे अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. ९ जून २०२५ रोजी दुपारी एक वाजता महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण / ऊर्जा दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यांना महावितरण संबंधित योजनांसंदर्भात अडचणी व तक्रारी असतील त्यांनी –https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSee1kpO5xbIprTTvl7AB4DDpkftMx-Lk9CzyQNGOW8gl-N5LQ/viewform – या संकेत स्थळावर रविवार दि. ८ जून २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले अर्ज दाखल करावेत, ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी महावितरणच्या संबंधित उपविभागीय कार्यालयात दि. ८ जून २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन गणपत लटपटे, अधिक्षक अभियंता, महावितरण कोल्हापूर मंडल यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावितरणची सहा विभागीय कार्यालये असून एकूण वीज ग्राहक संख्या १२.५८ लाख इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावितरणद्वारे घरगुती, औद्योगिक, व्यापारी, शेतीपंप व इतर ग्राहकांना वीजपुरवठा देऊन जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले जाते.
महावितरणमध्ये सद्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या योजनांमध्ये ग्राहकांना नवीन विद्युत पुरवठा देणे, ग्राहकांचा वीज भार वाढवणे अथवा कमी करणे, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राहकांना छतावरील सौरऊर्जा पॅनेलद्वारे विजपुरवठा करणे, शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा देणेकरीता कुसुम बी व मागेल त्याला सौरपंप देणे इत्यादी योजनांचा समावेश आहे. महावितरण दरबारमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांबाबत तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी दिली आहे.
—————————————————————————————-