कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अनेकदा आपण रोजच्या बातम्यांमधून, टीव्ही न्यूज मध्ये ऐकतो आज मान्सून अंदमान मध्ये आला, केरळ मध्ये आला वगैरे. पण मान्सून आला म्हणजे काय ? तो कुठून आला ? मान्सून म्हणजे काय ? असे प्रश्न अलिकडच्या मुलांना भेडसावत असतात. मान्सून अन् पावसाचा संबंध काय..याचा थोडक्यात आढावा..
मान्सून – ही हवामानाची एकत्रित अशी स्थिती आहे ज्यात हवेचा कमी दाबाचा पट्टा, सूर्याच्या उष्णतेने होणारी समुद्राच्या पाण्याची वाफ आणि ठरविक दिशेत वाहणारे वारे जे ढग समुद्रापासून भू-भागावर नेतात आणि तिथे पाऊस पडतो.
- मान्सून हवामान – मान्सून सारखे हवामान पृथ्वीच्या केवळ एकाच भागावर वर्षभर असते तो भाग म्हणजे विषुववृत्त आणि त्याच्या काही अक्षांश वर आणि खालचा पूर्ण प्रदेश.विषुववृत्ताच्या वर आणि खाली आपल्याला सदाहरित (नेहमी हिरवी झाडे असणारी) जंगले दिसतात. याचे हेच कारण आहे की तिथे सतत पाऊस चालूच असतो. आपल्या कडे पाऊस हा सिझनल म्हणजे वर्षातून ठरविक वेळीच येणारा आहे, पण जेव्हा पाऊस चालू होतो ते काही महिने आपली जंगले सुद्धा हिरवी दिसू लागतात आणि नद्या, धबधबे चालू होतात.
- मान्सून हा विषुववृत्त प्रदेशावरून येतो असे म्हणता येईल. परंतु यात “येतो” हा शब्द गती वाचक नसून स्थान वाचक आहे. म्हणजे विषुववृत्त प्रदेशाचा मान्सून हा वर्षभर दोन्ही गोलार्धात सहा सहा महिने असा झाडू सारखा फिरतो असे एक प्रकारे म्हणता येईल. त्या काल्पनिक झाडूचा आधार विषुववृत्त आणि काड्यांचा पसारा म्हणजे आपली कर्क वृत्त (उत्तर गोलार्धात) आणि मकर वृत्त (दक्षिण गोलार्धात) असा हा मान्सून पसरत असतो.
- हे मान्सून येणे जाणे म्हणजे पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याचा अक्ष 23.5 डिग्री कललेला असल्याने घडते.
- पृथ्वी सूर्याभोवती फिरताना ठरविक वेळी ठरविक स्थानी पोहोचून त्यामुळे पृथ्वीचा कर्क वृत्त भाग सूर्यासमोर जास्त प्रमाणात झुकलेला असल्याने आपल्या कडे त्यावेळी मान्सून येतो. हेच विरुद्ध बाजूला म्हणजे दक्षिण गोलार्धासाठी जेव्हा पृथ्वीचा मकरवृत्त भाग सूर्याच्या दिशेत झुकलेला असतो तेव्हा तिथे मान्सून सदृश्य पाऊस पडतो.
- इतर वेळी त्याचे मुख्य स्थान वर सांगितल्या प्रमाणे विषुववृत्त हेच असते.
- हे सर्व जरी ढोबळ मानाने सोपे वाटत असले तरी ही अतिशय गुंतागुंतीची सिस्टीम असल्याने अनेक स्थानिक हवामान पॅटर्न मान्सूनच्या येणे-जाणे कालावधी, तीव्रता यावर प्रभाव टाकत असतात. कधी हा प्रभाव कमी कालावधीत जास्त पाऊस पडणे, एखादा महिना पाऊसच न पडणे, ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सुद्धा आपल्याकडे पाऊस पडत राहणे अशा गोष्टी घडवतो.
- वर सांगितल्या प्रमाणे कर्क वृत्त जे मध्य भारतातून जाते त्याच्या वर उत्तर भारत असल्याने मान्सून हिमालयाच्या वर पर्यंत सर्वोच्च स्थितीत जातो आणि नंतर परत फिरतो असे म्हणता येईल. आपल्यासाठी नैऋत्य मोसमी वारे सुरु झाले म्हणजे मान्सून पाऊस आला असे भूगोलाच्या पुस्तकातील सामान्य ज्ञान पुरेसे आहे.
———————————————————————————-



