कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पुण्यानंतर सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत म्हाडाने परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण १९८२ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा आणि अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ करत नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे. “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर अर्ज स्वीकारले जाणार असून पात्र नागरिकांनी अर्ज करताना खालील ८ महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात घ्याव्यात:
✅ १. उत्पन्नासंबंधी माहिती अचूक द्यावी
अर्जदारास त्यांच्या जोडीदाराचे उत्पन्नही दर्शवावे लागेल.
जोडीदाराचे उत्पन्न नसल्यास अर्ज करताना शून्य (०) उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे.
पती-पत्नी यांनी वेगवेगळे अर्ज भरल्यास आणि उत्पन्नामध्ये तफावत आढळल्यास अर्ज बाद होईल.
✅ २. वैवाहिक स्थितीचे पुरावे आवश्यक
अर्ज करताना योग्य वैवाहिक स्थिती नोंदवावी.
घटस्फोटीत अर्जदाराने संबंधित आदेश अपलोड करावा.
विधवा किंवा विधुर अर्जदाराने मृत्यू दाखला अपलोड करावा.
✅ ३. संरक्षण दल कुटुंब व माजी सैनिकांसाठी स्वतंत्र प्रमाणपत्र
अशा अर्जदारांनी आपले सेवा प्रमाणपत्र किंवा माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
✅ ४. अधिवास (डोमासाईल) प्रमाणपत्र
बारकोड असलेले २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्रच स्वीकारले जाईल.
✅ ५. QR Code वापर अनिवार्य
नमुना वाटप आदेश, वाटप आदेश, ताबापत्र आणि ताबा पावती यांसह सर्व दस्तऐवजांवर QR Code दर्शविला जाईल.
✅ ६. DigiLocker द्वारे कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक
अर्जदार आणि जोडीदार यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड DigiLocker वरूनच प्राप्त करून अर्जात वापरणे बंधनकारक आहे.
अर्जदाराने DigiLocker वर नोंदणी करून माहिती अद्ययावत करावी.
✅ ७. नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर
सोडतीतील घरांसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी आणि माहिती पाहण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
✅ ८. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्व लक्षात ठेवावे
अर्ज नोंदणी करताना वेळेवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विलंब झाल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
या आठ गोष्टींचे पालन करून इच्छुक नागरिक सहज आणि सुरक्षित पद्धतीने अर्ज करू शकतात. सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील हजारो कुटुंबांसाठी ही लॉटरी मोठी संधी ठरणार आहे.