राधानगरी प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक आणून जनतेच्या अभिव्यक्ती आणि अन्यायाविरोधात संघटित होण्याचा अधिकार संपुष्टात आणून अघोषित आणीबाणी आणली असल्याचा आरोप करत राधानगरी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय पक्षसंघटनांच्या वतीनं मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
जन सुरक्षा विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी राधानगरी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय पक्ष संघटनेंच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला यावेळी जनसुरक्षा विधेयका विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्ती आणि अन्यायाविरोधात संघटित होण्याचं अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणलं असून सरकारचं हे विधेयक शहरी नक्षलवादाचा विमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचं शासन सांगत असलं तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती आणि संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणलं जात आहे असा आरोप करून जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या राज्य सरकारच्या या कृतीचा डावी आघाडी जाहीर निषेध करीत असल्याचं जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी सांगितलं.
यावेळी आबासाहेब चौगले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार,रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश चौगले,वंचितचे संजय कांबळे,किसान सभेचे तालुका अध्यक्ष दिनकर आदमापूरे,शिक्षक संघटनेचे विक्रम वागरे,विकास पाटील यांच्यासह आंदोलक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.





