कोल्हापूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ जाहीर केला आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांची सुमारे 48 हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकीही माफ करण्यात येणार आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे.
योजनेत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असून, पूर्वीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. नियमित कर्जफेडीची अटही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय ठिबक सिंचनासाठी प्रलंबित निधी वितरित करणे, सौरपंप व सौरकृषीवाहिनी योजनांचा विस्तार, जलयुक्त शिवार, गटशेती आणि सिंचन प्रकल्पांद्वारे शेती अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजनांची घोषणाही केली आहे.






