कोल्हापूर : १५ ऑक्टोबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. याबाबत आज कोल्हापुरात झालेल्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली.
साखरेचा किमान हमीभाव ५० रुपये किलो आणि इथेनॉलचा दर ७० रुपये प्रतिलिटर करावा, या मागणीसाठी २९ सप्टेंबरला हुबळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच १० ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २५ वी ऊस परिषद होणार आहे.
अपरिपक्व ऊसामुळे साखरेची रिकव्हरी घटून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा दावा संघटनेने केला आहे. नुकसान भरपाई म्हणून ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, इथेनॉल प्रकल्पांना व्याज सवलत द्यावी, ऊस वाहतूक दर अंतरानुसार निश्चित करावेत तसेच वजनकाटे डिजिटल व ऑनलाइन करावेत, अशा मागण्याही करण्यात आल्या.
२९ सप्टेंबरचे हुबळी आंदोलन आणि १० ऑक्टोबरची ऊस परिषद ऐतिहासिक ठरेल. या परिषदेत ऊस उत्पादकांच्या हक्कासाठी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.






