नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. विशेषतः कोल्हापूर–मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्याची विनंती त्यांनी केली. जमीन संपादनासह आवश्यक प्रक्रिया लवकर पूर्ण करून हा प्रकल्प वेगाने पूर्ण करावा, असेही त्यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले.
यावेळी कोल्हापूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याचे सातही दिवस सुरू करणे, कोल्हापूर–मुंबई वंदे भारत सेवा, कोल्हापूर–पंढरपूर–तिरुपती तसेच गुजरात व राजस्थानसाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करणे, सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत चालविणे, कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास आणि मालवाहतूक सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या मागण्याही करण्यात आल्या. या मागण्यांमुळे कोल्हापूरच्या रेल्वे विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.






