कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जोतिबाच्या नावानं चांगभलं….च्या गजरात आज जोतिबाच्या यात्रेला उधाण आले आहे. अवघा जोतीबा डोंगर गुलालाने माखून गेला आहे. दख्खनचा राजा जोतिबाच्या आज शनिवारी ता.१२ रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. शुक्रवारी दिवसभर यात्रेकरू डोंगरावर येत होते. मानाच्या सासनकाट्यासह इतर गावातून सासन काट्या घेऊन आलेल्या भाविकांच्या गर्दीने जोतिबा डोंगर फुलून गेलाय. आजच्या यात्रेला दहा लाखावर भाविक येतील असा अंदाज आहे.
कोल्हापूर छत्रपती राजश्री शाहू महाराजांची नगरी, पुरोगामी विचारांसह भक्तिमय वातावरण आणि अखंड असा निसर्ग लाभलेला हा जिल्हा. जिल्ह्यात करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्यासह अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत आणि यामुळे जिल्ह्यात कायम भक्तीमय वातावरण असतं. सध्या चैत्र महिना सुरू असून कोल्हापूरातील वाडी रत्नागिरीवर ज्योतिबा देवांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. माघ महिन्यात ज्योतिबाचे पाच थेटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा भरत असते.
ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी भरणाऱ्या चैत्र यात्रेची वेध गेल्या पंधरा दिवसापासूनच भाविकांना लागले होते. कामदा एकादशी पासून मानाच्या सासनकाठ्या कोल्हापुरात पंचगंगा घाटावर विसावा घेत पुढे डोंगराच्या दिशेचे मार्गस्थ होऊ लागल्या होत्या. शुक्रवारच्या रात्री महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात येथून आलेल्या पाच लाख भाविकांच्या उपस्थितीने जोतिबा डोंगर फुलून गेलाय. यात्रेसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे.
जोतिबा मंदिराच्या दिशेने जाणारा मार्ग फुलून गेला आहे. गुरुवार सकाळपासून खाजगी वाहने, एसटी-बस, बैलगाड्यांची वर्दळ सुरू होती. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी मार्गावर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. वाहनामध्ये बिघाड झाल्यास टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन तर्फे मोफत दुरूस्ती केली जात आहे. तसेच विविध सामाजिक संस्थामार्फत ताक,सरबत, पाणी वाटप केले जात आहे. यात्रेकरूंचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले आहेत.
मानाचा विडा देऊन सासनकाठ्यांचे स्वागत
यात्रेसाठी मानाच्या सासनकाठ्याचे पानाची विडा देऊन देवस्थान समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. साताऱ्यातील निनाम पाडळीची पहिली मानाची सासनकाठी गुरुवारी दाखल झाली. तर माऊचे विहीर (पाटण) कसबा डिग्रज (मिरज) आणि कसबा सांगाव (कागल) केवल (जि. सातारा) कवठेसार (जि.सांगली) रेठरे बुद्रुक साळुंखे (ता. कराड) यांच्या मानाच्या १०८ सासनकाठ्या सहभागी होतात. तसेच मान नसलेल्या आणि गावागावातून येणाऱ्या हजारो सासनकाठ्या सहभागी होत असतात ४५ सासनकाठ्या शनिवारी होणाऱ्या पालखी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या
या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणे आणि तोरण्या (दोर) सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते. ही तोरणे संभाळण्याचा मान प्रमुख तीन तक्क्षिमा मधील घराण्यांचा असतो आणि ते लोक ही तीन तोरणे कोशल्याने हाताळतात. मानाच्या १०८ सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या असून चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला आहे.
सासनकाठी म्हणजे काय?
सर्व विधी झाल्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते. सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या या पूर्वपार चाललेल्या परंपरेने आज ही हजारो सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर जातात. सासनकाठीस शासनकाठी असेही म्हणले जाते. सासनकाठी ही सुमारे ४० ते ४५ फूट उंचीचे जाड वेळुची (कळकाची) असते. हा कळक आणताना आणि निवडताना विशिष्ट प्रकारे पारख आणि पूजा विधी केला जातो. प्रत्येक सासनकाठीचे निशाण हे वेगवेगळे असते. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो, त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्त संत नावजीनाथच्या किवळ काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो.
यात्रेवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर
मंदीर आवार ब पार्किंग स्थळे या ठिकाणी १४० कॅमेरे, मुख्य दर्शन रांगेत दोन मीटर डिटेक्टर दरवाजे, पार्किंग व डोंगर परिसर पाहण्यासाठी पाच ड्रोन कॅमेरा कार्यान्वित केले आहेत. गाभाऱ्यातील व आवारातील भाविकाच्या कृती नियंत्रणासाठी परिपूर्ण कॅमेरे बसविले आहेत. यात्रा घरबसल्या पाहण्यासाठी देवस्थानच्या सोशल मिडीयावरून थेट प्रक्षेपण होणार आहे. दर्शन मंडपात थेट प्रक्षेपणाचे सोय केलीआहे. शिंदे देवस्थान येथे पोलिसांसाठी स्वतंत्र सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, डी वाय पाटील विद्यापीठाच्या सोल्युशन विभागात विद्यार्थी भाविक संख्या, वाहतूक संस्थेची नोंद ठेवणार आहेत.
मंदिरातील यात्रेची विधी : यात्रेची सांगता
पहाटे चार वाजता – पाद्यपूजा काकड , आरती -पहाटे पाच वाजता, शासकीय महाभिषेक- सकाळी सात वाजता, महापूजा-दुपारी बारा वाजता, संध्याकाळी पाच वाजता नाथांची आरती होऊन नाथांची पालखी श्री यमाई देवीकडे प्रस्थान करते. नाथांच्या पालखी बरोबरच नाथांचा मानाचा घोडा, उंट, वाजंत्री, देव सेविकांच्या सर्व लवाजम्यासह सर्व पुजारी यासह सर्व भक्तजण यमाई मंदिराकडे जातात. दरम्यान पालखी चौथऱ्यावर थांबून विसावा घेतला जातो आणि सूर्यास्तानंतर हिलाल दिवटीच्या प्रकाशात नाथांची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते आणि यमाई मंदिरासमोर सदरेवर नाथांची पालखी विराजमान होते. यानंतर जगदनीचे स्वरूप कट्यारीसोबत श्री यमाई म्हणजे रेणुका देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो. विवाह सोहळा संपूर्ण झाल्यानंतर नाथांची पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करते. प्रदक्षिणा करून नाथांची पालखी सदरेवर विराजमान होते आणि यानंतर तोफेची सलामी होऊन यात्रेची सांगता होते.
हजारो हात मदतीसाठी
या ज्योतिबाच्या यात्रेसाठी राज्यभरातून लाखों भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात. यात्रेच्या निमिताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो. तर संपूर्ण डोंगर गुलाबी रंगानी रंगून गेलेला असतो. या यात्रेत भाविक, भक्त यासह देवस्थान समिती, पोलीस प्रशासन प्रत्येक जण देवाची सेवा बजावत असतात.
आठ लाख भाविक डोंगरावर
यात्रेसाठी तब्बल आठ लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर उपस्थित राहणार असल्याची शक्यता असल्याने यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी पोलीस तसेच सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोन द्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येत असून डोंगरावर ये जा करण्यासाठी अनेक वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. तर यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक सेवा आणि संस्थांच्यावतीने ठिकठिकाणी मोफत अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले असून एसटी महामंडळाच्यावतीने २४ तास बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे.






