तुळजापूरचे वैशिष्टय़ असे की, संपूर्ण गावात, मग ते शुक्रवारपेठचे असो वा मंगळवारपेठेतील घरचे असो जेवणाची चव एकच असते. याचे कारणही गमतीशीर आहे. इथे गावातल्या गावातच स्थळ पाहून लग्न करण्यावर भर असतो. त्यामुळे शुक्रवार पेठेतली पोरगी जास्तीतजास्त मंगळवारात दिलेली असते. त्यामुळे मटणाचा मसाला करण्याची माहेरची व सासरची पद्धत जवळपास एकच असते. त्यामुळे एक गाव एक गणपती, एक पाणवठासारखे नसले तरी इथे ‘एक चव’ हे मात्र पाहायला मिळते. आता आता मात्र गावाच्या बाहेर मुली दिल्या जात असल्याने व बाहेरच्या इथे आणल्या जात असल्याने चवीत फरक पडला आहे, पण तो तितकासा जाणवत नाही. गावातच मुली देण्याचे एक दुसरे कारण काही जणांनी सांगितले. जवळपास प्रत्येक घरात यात्रेकरू वस्तीला असल्याने रोजचे देवीचे सिंहासन असो वा इतर पूजाविधी असोत, पुरणाचा किंवा पुरण आणि मटणाचा (ज्या त्या यात्रेकरूच्या परंपरागत रीतिरिवाजानुसार) घरातच स्वयंपाक करणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे आपल्या लेकीने रोजच पाचपन्नास लोकांचा स्वयंपाक करायचा, शेकडय़ांनी भाकऱ्या बडवायच्या हे परगावच्या कोणत्या आईबापाला आवडेल? शिवाय घरात मात्र ‘तिने काम नाही करायचे तर बायको कशाला आणली?’ अशी पूर्वापार चालत आलेली विचारसरणी असल्याने म्हणा किंवा स्वयंपाकाला बाई लावायची म्हणजे तिला पसे देणे आले ते टाळण्यासाठी म्हणा, स्वयंपाक घरच्या बाईमाणसांनाच करावा लागत असल्याने जाणूनबुजून आपली पोर या घरात कोण देणार? त्यामुळेच असेल स्थानिक पाहुणेरावळे आपसातच मुली देत असतात.
श्री तुळजा भवानी,तुळजापूर गाव आणि तिच्या गूढ गोष्टी व माहित नसलेल्या प्रथा परंपरा..भाग -३
तुळजापूर एक गाव, एक चव






