नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या २०३० राष्ट्रकुल ( कॉमनवेल्थ ) क्रीडा स्पर्धांचे यजमानपद स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तब्बल वीस वर्षांनी भारताला पुन्हा एकदा हा भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा सोहळा आयोजित करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
अहमदाबादवर विश्वास
जागतिक दर्जाची क्रीडांगणे, अत्याधुनिक सुविधा, सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची सोय व ‘मोठ्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचा अनुभव’ या सर्व बाबींचा सखोल आढावा घेतल्यानंतर अहमदाबाद शहराला ‘आदर्श यजमान शहर’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सरदार पटेल क्रीडा संकुलासह अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असलेले हे शहर २०३० मध्ये जगभरातील क्रीडाप्रेमींचे आकर्षण ठरणार आहे.
२०१० नंतरची पुन्हा संधी
भारताने यापूर्वी २०१० साली नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या वेळेस पायाभूत सुविधा, क्रीडांगणे आणि देशाच्या प्रतिमेत झालेली भरगोस वाढ अद्याप स्मरणात आहे. २०३० मधील आयोजनामुळे भारताला क्रीडा पायाभूत सुविधांची नवी उभारणी करता येणार असून, खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळण्याची मोठी संधी मिळणार आहे.
देशाच्या क्रीडा क्षेत्राला गती
या आयोजनामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात नवा आत्मविश्वास निर्माण होईल. ऑलिंपिकपूर्व तयारीसाठी खेळाडूंना दर्जेदार स्पर्धांचा अनुभव मिळेल. देशातील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळून क्रीडाक्षेत्राकडे आकर्षण वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आर्थिक व पर्यटन क्षेत्रालाही चालना
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांदरम्यान लाखो परदेशी पर्यटक भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हॉटेल, वाहतूक, पर्यटन आणि सेवा उद्योगांना मोठी चालना मिळेल. अहमदाबादसह संपूर्ण गुजरात राज्य आर्थिकदृष्ट्या लाभान्वित होईल.
सरकारची भूमिका
पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देताना सांगितले की, “भारताने जगाला आपली क्रीडा क्षमता आणि संघटन कौशल्य दाखवून द्यावे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन हा केवळ क्रीडा महोत्सव नसून भारताच्या विकासदृष्टीचा, आत्मनिर्भरतेचा आणि नव्या आत्मविश्वासाचा परिचय आहे.”
2030 मध्ये जेव्हा जगभरातील शेकडो खेळाडू अहमदाबादमध्ये एकत्र जमतील, तेव्हा संपूर्ण जगाची नजर भारतावर असेल. आधुनिक भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सामर्थ्य, व्यवस्थापनाची ताकद आणि सांस्कृतिक वैभव यांचा अद्वितीय संगम या सोहळ्यातून दिसणार आहे.
——————————————————————————————————