कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित कामाला विरोध दर्शवण्यासाठी “शक्तिपीठ नको आमच्या वावरात, शुक्रवारी तिरंगा झळकवू शेतात ” या घोषवाक्याखाली शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी एक अभिनव आंदोलन होणार आहे.
एक खास ऑनलाइन मीटिंग पार पडली असून त्यामध्ये त्यामध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अमित देशमुख, आ. अरूण आण्णा लाड, आ. कैलास पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शक्तीपीठ -महामार्ग जाणाऱ्या १२ जिल्ह्यातील अनेक राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. येत्या स्वातंत्र्य दिनापासून (Independence Day २०२५) शक्तिपीठ महामार्गाला नव्या जोमाने विरोधाची मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेत शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावात ग्रामसभेत १५ ऑगस्ट रोजी महामार्ग विरोधी ठराव पारित करून घेण्याचे ठरले आहे.
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शेतात तिरंगा फडकवून विरोध नोंदवला जाणार आहे. आंदोलनाची सुरुवात सकाळी ९.०० वा. आकुर्डे ( ता. भुदरगड ) येथील दौलत शिंदे यांच्या शेतातून होईल. त्यानंतर सकाळी १०.०० वा. एकोंडी (ता. कागल) लोंढे वसाहत येथे शिवाजी मगदूम यांच्या शेतात आणि सकाळी ११.०० वा. कोगील बुद्रुक ( ता. करवीर ) येथील सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात समारोप होईल.
या आंदोलनात माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, सम्राट मोरे, ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील, शिवाजी मगदूम, राहुल बजरंग देसाई, जीवन पाटील, सत्यजित जाधव, शामराव देसाई, सचिन घोरपडे, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, बिद्रीचे संचालक एस. आर. कांबळे, एस. बी. पाटील, सुयोग वाडकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कशी सुरु आहे?
१२ जिल्ह्यांतून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी ३७१ गावांमधील ८०२४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी ७६२५ हेक्टर खाजगी जमीन म्हणजेच शेतकऱ्यांची जमीन असणार आहे. तर २६२ हेक्टर शासकीय आणि १२३ हेक्टर वनक्षेत्राची जमीन असणार आहे. सध्या सर्व १२ जिल्ह्यांमध्ये मोजणीची प्रक्रिया सुरु आहे. महामार्गाच्या सुरुवातीच्या म्हणजेच वर्धा, यवतमाळ आणि अंतिम टोकावरील सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात संयुंक्त मोजणी प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. सोलापूरमध्ये ही मोजणीचे काम समाधानकारकरीत्या प्रगतीपथावर आहे. महामार्गाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच नांदेड, हिंगोली, परभणी, बीड धाराशिव या जिल्ह्यात अल्प गतीने मोजणीचे काम सुरु आहे. तर लातूर, सांगली आणि खासकरून कोल्हापूरमध्ये शेत जमिनीच्या मोजणीच्या कामाला तीव्र विरोध असल्याने या ठिकाणी मोजणी अत्यंत संथ गतीने सुरु आहे. अजून सरकार ने जमिनीसाठी किती मोबदला दिला जाईल त्याचे सूत्र जाहीर केलेले नाही.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आता विरोधकांनी १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचा आणि राष्ट्रीय ध्वजाचा वापर करण्याचे ठरविल्याने शक्तीपीठ महामार्गाला विरोधाचा नवा सूर उभा होता असल्याचा चित्र आहे. दरम्यान समर्थक शेतकरी ही खासकरून विदर्भ आणि मराठवाड्याच्या अपेक्षित विकासाचा मुद्दा समोर करून सक्रिय आहेत. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी खरंच किती ठिकाणी विरोधाचा स्वर बुलंद होतो, किती ग्रामसभांमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात बहुमतांनी ठराव मंजूर होतात, हे १५ ऑगस्ट रोजी स्पष्ट होईल.
——————————————————————————————