कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात कालपासून हवामानात बदल झालेला आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच श्रावणसरी अनुभवायला मिळत आहे. ‘क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे’ अशी स्थिती पहायला मिळत आहे. जुलैचा शेवटचा आठवडा कोल्हापूरकरवासियांना धडकी भरविणारा असतो. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत. या परिस्थतीत एकसारखा तीन ते चार दिवस पाऊस पडला तरी महापुराचा धोका उद्भवू शकतो. मात्र पावसाची उघडझाप सुरु असल्याने पावसाची भीती वाटत नाही. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे.
कोल्हापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.पंचगंगा नदी इशारा पातळीजवळ पोहोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे, तर धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणातूनही प्रतिसेकंद ५हजार ७८४ घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे ३ व ६ हे दोन स्वयंचलीत दरवाजे खुले आहेत. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.
दरवर्षीपेक्षा यावेळी राज्यात मान्सून लवकरच दाखल झाला आहे. सध्या वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस सुरू आहे. फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस सुरू असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. राज्यात यंदा पाऊस चांगला राहण्याची शक्यता देखील आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये म्हणावा तसा पाऊस अजूनही झाला नसल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. भारतीय हवामान विभागाने काल अनेक भागांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट दिला होता.
आज देखील हवामान खात्याकडून काही भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला. कोकण, विदर्भामध्ये आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. काल झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमधील रस्त्यावर पाणी साचले. रविवारी सकाळीच पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले आणि साधारपणे कमी जास्त करत २४ तास पाऊस अनेक भागांमध्ये होता.
पुढील दोन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.