कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) लवकरच एक नवा डिजिटल बदल आणत असून, त्यामध्ये नागरिकांना मोबाईल नंबर, नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासारखी महत्वाची माहिती घरबसल्या अपडेट करण्याची परवानगी दिली जाणार आहे. ही सेवा नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
या सर्व माहितीचा बदल कुठल्याही आधार केंद्राला न जाता, घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून करता येईल. या प्रक्रियेसाठी संबंधित दस्तऐवज अपलोड करून त्याची पडताळणी करता येईल.
नवीन क्यूआर कोड आधारित अॅप
प्राधिकरण लवकरच एक मोबाईल अॅप सुद्धा लाँच करणार आहे. या अॅपद्वारे :
-
आधार कार्डाचा मास्क केलेला किंवा पूर्ण क्यूआर कोड सहज शेअर करता येईल
-
केवायसी किंवा अन्य पडताळणीसाठी तुम्हाला आधारची फोटोकॉपी द्यावी लागणार नाही
-
सुरक्षा आणि गोपनीयतेचा अधिक चांगला अनुभव मिळणार आहे
बायोमेट्रिक बदल मात्र केंद्रातच
यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा की, फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन (बायोमेट्रिक डेटा) अपडेट करण्यासाठी मात्र नागरिकांना नजीकच्या आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल.प्राधिकरणाच्या धोरणानुसार, बायोमेट्रिक डेटाचा बदल ऑनलाईनद्वारे करणे सध्या शक्य नसल्याने ही अट लागू राहणार आहे.
कोणत्या वेळेस काय शुल्क
प्राधिकरणाकडून सध्या काही अपडेट मोफत देण्यात येत आहेत. मात्र, नोव्हेंबर २०२५ नंतरही काही सेवा मोफत राहतील का, यावर अधिकृत माहिती लवकरच दिली जाईल. दरम्यान, सध्याच्या नियमांनुसार :
-
ऑनलाइन अॅड्रेस अपडेट: ₹५०
-
नाव / जन्मतारीख बदल: ₹५० ते ₹१०० पर्यंत (प्रमाणपत्रानुसार)
प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनेज वधावन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “आधारची गरज प्रत्येक नागरिकासाठी असून, त्यामुळे त्याचं अपडेट करणं सोपं करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. नागरिकांना वेळ वाचावा आणि प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी आम्ही डिजिटल सेवा सुरू करत आहोत.”
———————————————————————————————