पाच लाख लाडक्या बहिणींना केवायसीचे आवाहन…

0
159
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता हजारो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, केवायसी (KYC – Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सुमारे पाच लाख पात्र महिलांना या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली असून, पात्र महिलांना दरमहा ठराविक आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे. मे महिन्यापासून या योजनेचा पहिला हप्ता खात्यावर जमा होऊ लागला आहे. अनेक महिलांनी खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री दिली आहे.

परंतु, केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे लाखो महिलांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. संबंधित महिलांनी आवश्यक दस्तऐवज सादर न केल्यामुळे त्यांचा लाभ रोखण्यात आला आहे. शासनाने यापूर्वी केवायसी पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती, मात्र अजूनही हजारो महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

जिल्हा प्रशासन आणि महिला व बालकल्याण विभागाकडून वारंवार सूचना दिल्या जात असल्या तरी महिलांमध्ये अद्याप पुरेशी जनजागृती झालेली नाही, अशी कबुली अधिकाऱ्यांनी दिली. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना केवायसी प्रक्रियेबाबत माहिती नसल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे त्या योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारकडून १ जून ते १ जुलै २०२५ या कालावधीत आधार, बँक तपशील आणि उत्पन्न प्रमाणपत्र यांसह आवश्यक केवायसी कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागाने सर्व पात्र महिलांना लवकरात लवकर नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून पुढील हप्ते वेळेवर मिळू शकतील.

महत्वाची सूचना :

योजना लाभ मिळवण्यासाठी आवश्यक केवायसी दस्तऐवज –

  • आधार कार्ड

  • बँक पासबुक

  • रहिवासी प्रमाणपत्र

  • मोबाईल क्रमांक

महिलांनी ही कागदपत्रे घेऊन जवळच्या ‘महात्मा गांधी सेवा केंद्र’ किंवा ‘सेतू केंद्रा’वर संपर्क साधावा.

सरकारने अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी आणि फक्त गरजूंनाच या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उत्पन्न कर विभागाच्या डेटाचा वापर करून लाभार्थी पडताळणी सुरू केली आहे. या प्रक्रियेमुळे अर्जात खोटी माहिती देऊन लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज नाकारले जाणार आहेत.
————————————————————————————–

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here