प्रसारमाध्यम : कोल्हापूर
यावर्षी होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय कोल्हापूर मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक कृष्णात खोत यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्याची परंपरा समृद्ध करणारे, लेखन-साधनेस जीवन समर्पित करणारे साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे.. रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे भरणार आहे.
मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेच्या संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हा शाखेच्यावतीने ‘पहिले अखिल भारतीय कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन – २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे “विद्याभवन सभागृह”, राजर्षी शाहू साहित्य संमेलन नगरी, कोल्हापूर येथे भरणार आहे.
या ऐतिहासिक संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्याची परंपरा समृद्ध करणारे, लेखन-साधनेस जीवन समर्पित करणारे कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे . हे संमेलन तीन सत्रात भरविले जाणार असून नवोदित कवींना संधी दिली जाणार आहे . खोत यांनी यापूर्वी बेळगाव, कडोली, चिंचवड, भिलवडी, खानापूर, बलवडी, सावळज, बिसूर आणि उत्तूर येथे भरलेल्या विविध साहित्य संमेलनांमध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून यशस्वी अध्यक्षता केली आहे. मराठी साहित्यातील ग्रामीण वास्तवाचे सखोल आणि हृदयस्पर्शी चित्रण करणारे श्री. कृष्णात खोत हे प्रगल्भ साहित्यिक आहेत. त्यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनातील संवेदना, संघर्ष, संस्कृती आणि अस्मिता यांचे प्रखर दर्शन घडते.
यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन आयोजित केले आहे. यावेळी परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय साबळे व महिला जिल्हाध्यक्षा सौ. मनिषा डांगे तसेच मार्गदर्शक सीमाकवी रवींद्र पाटील व अर्जुन हराडे यांनी संमेलनाची माहिती दिली.
कृष्णात खोत यांच्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये गावठाण, रौंदाळा, झड-झिंबड, धुळमाती, रिंगाण, काळ्यामाळ्या भिंगोळ्याखोत आणि भिंतीत रचलेल्या दगडी डोळ्यांचे भगदाड यांचा समावेश आहे.नांगरल्याविन भुई हे त्यांचे शब्दचित्र तर आईबाईच्या नावानं हा कथासंग्रह विशेष गाजला आहे.
यापूर्वी कृष्णात खोत यांना खोत साहित्य अकादमी पुरस्कार (२०२३), महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार (२०१९),भैरूरतन दमाणी पुरस्कार (२००८), आण्णा भाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार (२००६), ह. ना. आपटे राज्य वाङ्मय पुरस्कार (२०१७) व साने गुरुजी हे मनाचे साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.