प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा केली. 2029-30 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, 2047 पर्यंत ती पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी दहा लाख रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच येत्या काही वर्षांत दरडोई उत्पन्न जवळपास दहापट वाढविण्याचा सरकारचा मानस आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर परदेशी व देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष धोरण आखले जात असून, 13 ते 14 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक आणण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. प्रगत उत्पादने, आघाडीचे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित विकास, तसेच वित्त सेवा क्षेत्रात राज्याला देशात अग्रस्थानावर नेण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी ठोस धोरणे, दीर्घकालीन नियोजन आणि उद्योगस्नेही वातावरणाच्या माध्यमातून ही उद्दिष्टे साध्य करण्यात येतील, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.




