प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
नवी दिल्ली, प्रतिनिधी अॅप-आधारित टॅक्सी सेवांमधील खाजगी कंपन्यांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत टॅक्सी’ हा सहकारी तत्त्वावरील नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केली. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिल्लीत ही माहिती दिली. दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमधील चालकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, ‘भारत टॅक्सी’मध्ये चालक हा केवळ ड्रायव्हर नसून ‘सारथी’ असेल.
शाह म्हणाले की, सध्याच्या खाजगी कंपन्या चालकांकडून २५ ते ३० टक्के कमिशन आकारतात. मात्र ‘भारत टॅक्सी’मध्ये ८० टक्के नफा थेट चालकांना दिला जाईल, तर उर्वरित २० टक्के रक्कम सहकारी भांडवल म्हणून राखली जाईल. फक्त ५०० रुपयांचा शेअर खरेदी करून चालक संस्थेचे सह-मालक बनू शकतील.
‘अमूल’ मॉडेलची पुनरावृत्ती करत सहकाराच्या माध्यमातून मोठी चळवळ उभारण्याचा सरकारचा मानस आहे. ज्या पद्धतीने Amul ने लाखो महिलांना जोडून १.२५ लाख कोटी रुपयांची उलाढाल उभी केली, त्याच धर्तीवर ‘भारत टॅक्सी’ उभी राहील, असे शाह यांनी स्पष्ट केले. पुढील तीन वर्षांत प्रत्येक महापालिका क्षेत्रात सेवा सुरू करून १५ कोटी चालकांना जोडण्याचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अॅपमध्ये ‘सारथी दीदी’ हे विशेष फीचर असेल. या सुविधेद्वारे महिला प्रवाशांना महिला चालकांची निवड करता येईल. चालकांच्या तक्रार निवारणासाठी कॉल सेंटर व प्रत्यक्ष कार्यालयाची सोय करण्यात येणार आहे.
नवीन वाहन खरेदीसाठी सहकारी बँकांमार्फत सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. तसेच विमा संरक्षणासाठी IFFCO Tokio यांच्यामार्फत सुविधा दिली जाणार आहे.
अमित शाह, भारत टॅक्सी, सहकार चळवळ, अमूल मॉडेल, कॅब चालक, सारथी दीदी, केंद्र सरकार, दिल्ली NCR
व्हिडिओ बातमी पहा आमच्या youtube चॅनेल वर





