मुंबई : विशेष प्रतिनिधी
सरकार जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून विरोधकांना तुरुंगात डांबण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र, ती साकार होणार नाहीत, असे शिवसेना ( ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावत सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात दंड थोपटले. तसेच संबंधित विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. माकपने जनसुरक्षा विधेयकाविरोधात मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सरकारवर निशाणा साधला.
हिंदीच्या सक्तीवरून सरकारला माघार घेण्यास भाग पाडणाऱ्या ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाविरोधात आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर आणि भाजपावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. पहलगामचे अतिरेकी कुठे गेले ? ते भाजपत गेले का ? भाजपात जाणारे सर्वच साधू संत होतात. आणि विरोधात बोलतील ते देशद्रोही आहेत. ही सत्तेची मस्ती आम्ही चालू देणार नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती, पण आज ११ वर्षांपासून अघोषित आणीबाणी सुरू आहे. त्याविरोधात लढणं आवश्यक आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडे पाशवी बहुमत असले तरी रस्त्यावर सत्ता आमची आहे. गरज पडली तर रस्त्यावर उतरूनही लढाई लढू असा इशारा ठाकरे यांनी दिला.
शेतकरी आंदोलन आणि भाजपाची नक्षलवादी टीका यावरही ठाकरे यांनी समाचार घेतला. जुन्या आठवणी जागवताना त्यांनी म्हटले की “२०१८ मध्ये नाशिकहून हजारो शेतकरी लाल बावट्यांसह मुंबईत आले होते. मी आणि आदित्य त्यांना भेटलो. त्यावेळीही भाजपाने त्यांना नक्षलवादी ठरवले. पण त्यांचं रक्त लाल होते, त्याच रक्ताशी माझी बांधिलकी आहे. आता हिंदी सक्ती करत होते, सरकारला आम्ही मोठा दणका दिला.
आमचा हिंदी भाषेला विरोध नाही पण आम्ही तिची सक्ती कुणाच्या माथी मारू देणार नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोप-यात सरकारच्या जीआरची होळी केली. त्यानंतर आता जनसुरक्षा विधेयक आणून तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
————————————————————————————————–