कुरुंदवाड : प्रतिनिधी
जिल्ह्यासह धरणपाणलोट क्षेत्रात कालपासून पावसाने काही अंशी उसंत घेतली आहे. यामुळे कोयना, वारणा, राधानगरीतुन होणारा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे. विसर्ग कमी झाला असला तरी शिरोळ तालुक्यातील कृष्णा – पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढच होत आहे.
कृष्णेच्या पाणी पातळीत रात्रीतून चार फुटाने वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील बहुतांशी मार्गावर पाणी येत असल्याने अनेक गावांचा एकमेकाशी संपर्क तुटला आहे. तालुक्यात कृष्णेचे पाणी आता शेतशिवार, ओढे, नाले पार करुन गावभागात शिरले आहे. यामुळे नदीकाठावरील रहीवाश्यांना स्थंलातर करावे लागत आहे.
दरम्यान कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सकाळी ६ वाजता १३ फुटावरुन ११ फुटापर्यंत खाली आणण्यात आले आहेत. यामुळे यातून सुरु असलेला एकूण ९५,३०० क्युसेक विसर्ग कमी करुन तो ८२,१०० क्युसेक करण्यात आला आहे. वारणा धरणातूनही आज सकाळी ७ वाजता सुरु असलेला एकूण २२,४६० विसर्ग कमी करुन तो एकूण १५,३६९ क्युसेक करण्यात आला आहे. तर राधानगरी धरणातून ४३५६ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. अलमट्टी धरणातून एकूण अडीच लाखाने विसर्ग पुढे कर्नाटकात सोडण्यात येत आहे.
कालपासून बहुतांशी ठिकाणी पावसाने घेतलेली उसंत, विविध धरणातून कमी करण्यात विसर्ग, अलमट्टीतून वाढविण्यात आलेला विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील पुरपरिस्थिती आज सांयकाळपासून काही प्रमाणात निवळण्यास सुरुवात होईल अशी आशा आहे.