प्रसारमाध्यम डेस्क
महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. ही रचना झाल्यानंतर लवकरचं निवडणूकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. सध्या या सर्व ठिकाणी प्रशासक कार्यरत आहेत. यामुळे आता शहरी भागात निवडणुकीचे वेध लागले आहेत.
कोणत्या महापालिकांची प्रभाग रचना बदलणार :
राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, अमरावती, अहिल्यानगर,अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी,जळगाव, नांदेड-वाघाळा, या महापालिकांची प्रभाग रचना बदलणार आहे.
ड वर्गातील महापालिकेतील प्रभाग रचना:
ड वर्गातील महापालिकेत प्रभाग रचना ठरवताना शक्यतो सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत . मात्र, सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा ५ सदस्यांचा होईल किंवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे होतील. यात अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे.
अ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूर
ब वर्ग महानगरपालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग महानगरपालिका – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली
मुंबईतील प्रभाग रचना बदलणार नाही. मुंबई मध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये २२७ एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. मात्र इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.