प्रसारमाध्यम न्यूज : कोल्हापूर
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये गडकिल्ल्यांवर, रानावनात भटकंतीला गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचे हल्ले याही वर्षी वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यांत मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या वीसहून अधिक घटना घडल्या असून, दोन जणांचा मृत्यू आणि दीडशेहून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत.
भटकंतीच्या वेळी मधमाश्यांनी केलेले हल्ले पर्यटकांच्या जीवावर बतले आहेत. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताने पर्यटक, किल्लाप्रेमींना त्रास झाल्याच्या घटना दर वर्षी पुढे येतात. त्यात आता मधमाश्यांच्या हल्ल्यांची भर पडली आहे. रानावनात लागणाऱ्या वणव्यांमुळे; तसेच पर्यटकांच्या उपद्रवामुळे मधमाश्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. दर वर्षी यात वाढ होते आहेत.
- मधमाश्यांनी पाठलाग केल्यास घाबरून धावपळ न करता, अंगाभोवती कापड, चादर लपेटून घ्यावी.
- भटकंतीला जाताना उग्र वासाचे परफ्युम, सुगंधी द्रव्यांवा वापर टाळावा
- मधमाश्यांचे पोळे असलेल्या भागांत सिगारेट ओढणे कटाक्षाने टाळावे
- मधमाश्यांच्या परिसरात चूल पेटवून स्वयंपाक, गोंगाट टाळावा.
- अलीकडे मधमाश्या आणि इतर कीटकांच्या हल्ल्यांपासून बचाव करणारे काही स्प्रे, क्रीम उपलब्ध झाले आहेत, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा वापर करावा.
हल्ले का होत आहेत?
- उन्हाळ्यात मधमाश्या आक्रमक होतात
- बहुतांश पोळी ही शांत परिसरात असतात, गर्दी, मोठा गोंगाटामुळे त्या आक्रमक होतात
- सुगंधी द्रव्य, अत्तर, डिओडूंटमुळे मधमाश्या पाठलाग करतात
- मधमाश्यांना दगड मारून डिवचणे
- पोळ्याजवळ शेकोटी, चूल पेटवणे
- पोळ्याजवळ सिगारेट ओढल्याने
- जवळ जाऊन सेल्फी स्टिकने फोटो काढणे
अतिधाडस बेतते जीवावर
माहितगाराशिवाय गिर्यारोहणाला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी, याचे प्रशिक्षण अनेकांना नसते. त्यामुळे पावसाळ्यातही गडकिल्ल्यांवर, घनदाट जंगलात वाट चुकणे, धबधब्यांमधून वाहून जाणे, असे अपघात वाढले आहेत. यात आता मधमाश्यांच्या हल्ल्यांची भर पडली आहे. हल्ला झाल्यास काय करावे, याची माहिती नसल्याने पर्यटक पळत सुटतात आणि हल्ल्याची व्याप्ती अधिक वाढत जाते.
गेल्या तीन महिन्यांत नोंदवलेल्या घटना
- शिवनेरी किल्ल्यावर महिनाभरात तीन वेळा पर्यटकांवर हल्ले.
- कर्नाळा किल्ल्याच्या मार्गावर झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू, दोन पर्यटक गंभीर जखमी
- अकोला-बार्शीटाकळी येथे झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू
- कोल्हापूर-कुरूंदवाड येथे मधमाश्यांच्या डंखामुळे पाच जण जखमी
- पांडवगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये सहाजण गंभीर जखमी
- एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात भाविकांवर मधमाश्यांचा हल्ला
- नंदुरबार येथील आदिवासी आश्रमशाळेत १३ विद्यार्थी जखमी
- सिंहगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात २० पर्यटक जखमी
- अंजिठा लेणी येथील हल्ल्यात १० पर्यटक जखमी
- चंद्रपूर येथील हल्ल्यात तीन बकऱ्यांचा मृत्यू, १५ बकऱ्या जखमी
निर्मनुष्य ठिकाणी मधमाश्यांची पोळी
शहराबाहेर, गावांबाहेर असलेल्या मोठ्या ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ल्यांवरील बांधकामे, बुरूज-कमानींच्या खालील गारवा असलेल्या भागात, लेण्यांमध्ये वर्षानुवर्षे मधमाश्यांची मोठी पोळी आहेत. गावांबाहेरील प्राचीन मंदिरांच्या आवारात शांतता असलेल्या ठिकाणीही पोळी बघायला मिळतात. एखादा अपवाद वगळता, मधमाश्या स्वतःहून हल्ला करत नाहीत, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यासच त्या आक्रमक होतात, असे अभ्यासक सांगत आहेत. सध्या होत असलेल्या हल्ल्यांमागे पर्यटकांची चूक किंवा अथवा धाडस त्यांच्यावर बेतल्याचे स्पष्ट झाले आहे.