spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeइतिहासरायगडचा गूढ इतिहास उलगडतोय ! तीनशे हून अधिक वाड्यांचे अस्तित्व

रायगडचा गूढ इतिहास उलगडतोय ! तीनशे हून अधिक वाड्यांचे अस्तित्व

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेल्या रायगड किल्ल्याच्या इतिहासात अजूनही अनेक गूढ गोष्टी दडल्या आहेत. ऐतिहासिक नोंदीं पलीकडे जाऊन पुरातत्त्व खात्याच्या संशोधनातून समोर येतंय की, या गडावर कधी काळी तब्बल तीनशे हून अधिक वाडे होते ! ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे केवळ तर्क नाही उत्खनन आणि हवेतून (एरिअल) चित्रीकरणातून याचे स्पष्ट पुरावेही हाती लागले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये रायगड किल्ल्याची निवड स्वराज्याच्या राजधानीसाठी केली होती. याच गडावर १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक पार पडला. रायगड केवळ एक दुर्ग नव्हता, तर ते स्वराज्याचं प्रशासन, धोरण, न्याय, आणि संस्कृती यांचं केंद्रस्थान होतं. रायगडाचा इतिहास अनेक घटनांचा साक्षीदार आहे. संभाजी महाराजांचा कारभार, मुघल आणि पेशव्यांचा ताबा, आणि शेवटी ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली येणं. त्यामुळे रायगड हा नेहमी इतिहासात केंद्रस्थानी राहिला आहे.

संग्रहित फोटो – साभार -इंटरनेट

इतिहासाच्या मुख्य प्रवाहात रायगडावर ३०० पेक्षा अधिक वाडे होते, याचा उल्लेख क्वचितच आढळतो. पण ही माहिती केवळ लोककथांपुरती मर्यादित नाही. पुरातत्त्व विभागाच्या अलीकडील उत्खनन आणि हवेतून केलेल्या (एरिअल) सर्व्हेमध्ये या वाड्यांचे ठसे आढळून आले आहेत. 

संग्रहित फोटो – साभार -इंटरनेट

आतापर्यंत सहा वाड्यांचं उत्खनन पुरातत्त्व विभागाने केलं आहे. या वाड्यांची रचना, पाया, घरांचे अवशेष, अंगण, पाण्याच्या सोयी यावरून हे केवळ सैनिकांसाठीचे वा लहान वाडे नव्हते, तर वरिष्ठ दरबारी, कुटुंबीय किंवा विशेष प्रशासकीय अधिकारी इथे वास्तव्यास असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

उरलेल्या शेकडो वाड्यांचे अवशेष अजूनही गडावर विखुरलेले आहेत. त्यांचं शास्त्रशुद्ध उत्खनन झाल्यास रायगडाच्या भूमीत किती संपन्न आणि विस्तृत जीवन चालायचं, याची कल्पना येऊ शकते.

संवर्धन आणि जतनाची गरज –

इतिहासाला पुन्हा उभं करणं हे केवळ उत्खननापुरतं मर्यादित नसतं. त्या अवशेषांचं जतन, त्यांचा नीट नकाशा तयार करणं, शिलालेख, संरचना आणि नोंदींचं जतन करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. रायगडाचं संवर्धन हे केवळ पर्यटनासाठी नव्हे, तर आपल्या सांस्कृतिक ओळखीच्या जतनासाठीही अत्यंत आवश्यक आहे.

संग्रहित फोटो – साभार -इंटरनेट

महापुरुषांची भेट – 

महात्मा फुले आणि लोकमान्य टिळकांनी रायगडाला भेट दिल्याचे ऐतिहासिक उल्लेख सापडतात. या भेटी केवळ राजकीय नव्हत्या, तर त्या इतिहासाची प्रेरणा घेणाऱ्या नव्या पिढीसाठी एक संदेश होत्या. “स्वराज्य ही फक्त भूतकाळातली संकल्पना नसून, ती भविष्याच्या राष्ट्रनिर्मितीची दिशा असू शकते.”

रायगड किल्ला म्हणजे केवळ एक गड नाही, तर तो आपली अस्मिता आहे. तिथे असलेले हे ३०० हून अधिक वाडे म्हणजे फक्त दगड नाहीत, तर ते त्या काळातील समाजजीवन, प्रशासन, आणि सांस्कृतिक वैभवाचे जिवंत दस्तऐवज आहेत. आज गरज आहे ती इतिहासाच्या या मौल्यवान ठशांना समजून घेण्याची, अभ्यासण्याची, आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची. जर हे संशोधन आणि उत्खनन याच गतीने सुरू राहिलं, तर भविष्यात आपण रायगडाच्या प्रत्येक वाड्याचं रहस्य उलगडू शकतो. तेव्हा पुढच्या वेळेस रायगडावर गेलात, तर केवळ किल्ला पाहू नका त्या मातीतील इतिहासाचा श्वास ऐका.

रायगडावरील हे ऐतिहासिक अवशेष केवळ दगडमातीचे नाहीत, तर आपल्या स्वराज्याच्या वैभवशाली आणि गतिमान जीवनशैलीचे साक्षीदार आहेत. या वाड्यांचे उत्खनन आणि संवर्धन म्हणजे भविष्यासाठी ऐतिहासिक दालन उघडण्यासारखं आहे. शिवकालीन स्थापत्य, प्रशासन आणि सामाजिक रचना यांचा वेध घेण्यासाठी रायगड हा जिवंत ग्रंथ ठरत आहे. इतिहासाकडे केवळ स्मरणरंजन म्हणून नाही, तर अभ्यास आणि आत्मभान म्हणून पाहण्याची हीच वेळ आहे !

——————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments