महाराष्ट्रातील मातीचे प्रकार आणि त्या मातीत येणाऱ्या आंब्यांची चव, रंग, गंध यामधील बदल हे अतिशय रोचक विषय आहेत. महाराष्ट्रातील मातीचा प्रमुख पहिला प्रकार जो आहे तो काळी माती (Regur Soil / Black Cotton Soil) असे म्हणतात. अश्या प्रकारची माती विदर्भ, मराठवाडा,खानदेश या भागात सापडते ही माती खनिजांनी समृद्ध, जलधारण क्षमता जास्त. या भागात स्थानिक जातीतले आंबे येतात ‘कापरी’, ‘तोतापुरी’, ‘राजापुरी’ वगैरे त्यांची चव थोडी तुरट किंवा आंबटसर मिठास,रंग गडद पिवळसर किंवा हिरवटसर,गंध सौम्य, फारसा गोडसर नसतो, मातीचा दुसरा प्रकार म्हणजे लाल माती (Laterite Soil) ही महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम घाट, काही ठिकाणी सातारा, पुणे परिसर या भागामध्ये सापडते. या मातीत लोखंड-ऑक्साईड जास्त असते व पाण्याचा निचरा चांगला, थोडी उष्ण असते मातीच्या चांगल्या गुणधर्मा मुळे उत्तम प्रतीचा म्हणजे प्रीमियम दर्जेचा आंबा येतो. हापूस/अल्फान्सो, पायरी, रायवळ, मंजरिया – हे सगळे आंबे याच मातीत येतात. चव अत्यंत गोड, मऊसर, तोंडात विरघळणारी रंग तर आकर्षक केशरी-पिवळा या आंब्यांचा गंध अत्यंत सुगंधी, गोडसर, मनमोहक. मातीचा तिसरा प्रकार जो आहे तो वालुकामय माती (Sandy Soil) ही माती नदीकिनाऱ्याचे भाग, जसे की गोदावरी, भीमा, कृष्णा परिसर येथे सापडते. पाणी झपाट्याने झिरपते, उष्णता जास्त, पोषणतत्त्व कमी या मातीत स्थानिक प्रकारचे आंबे – लवकर पिकणारे, पण टिकाऊ नसलेले आंबे पिकतात. चवीला पांचट व कधी गोडसर त्यांचा रंग फिकट पिवळा व गंध सौम्य किंवा फारसा विशेष नसलेला. महाराष्ट्रातील मातीचा चौथा प्रकार गडद तपकिरी माती (Alluvial/Clayey Loam) ही माती नाशिक, नगर, कोल्हापूर भागात काही ठिकाणी सापडते. अतिशय सुपीक, पण जड, ओलसर माती असते यात ‘तोतापुरी’, ‘नेल्यम’, ‘बदामी’ असे विविध संकरित प्रकार पिकतात चवीला थोड संतुलित (गोड आणि तुरट) रंग हा पिवळसर किंवा केशरी गंध मध्यम सुगंधी, पण हापूससारखा टोकाचा नाही.
मातीचा आंब्याच्या चव-गंधावर परिणाम कसा होतो?
१. खनिज घटक (minerals):
फॉस्फरस, पोटॅश, लोह, झिंक इ. चा प्रभाव फळाच्या गोडव्यावर व गंधावर होतो
२. जलधारण क्षमता:
मातीतील आर्द्रता जितकी योग्य, तितका आंबा रसाळ आणि गोड होतो
३. तापमान आणि हवामान:
लाल माती असलेल्या कोकणात हवामान उष्ण आणि दमट, त्यामुळे आंबा अधिक सुगंधी व रसरशीत
आपल्या महाराष्ट्रातील जिल्हयानुसार पिकणारा आंबा व जिल्ह्यातील माती हवामान पाणी यांचा होणार परिणाम ही आपण पाहू.
“हापूस (अल्फोन्सो)” हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड या भागात पिकतो. या जिल्ह्यात लाल सच्छिद्र मुरमाड माती सापडते. येथील हवामान समुद्र जवळ असल्यामुळे उष्ण व दमट आहे. दिवसा गरम व रात्री दमट हवामाना मुळे अतिशय गोड,तोंडात विरघळणारा रसाळ आंबा बनतो. सुगंध इतका टोकाचा की हाता मध्ये घेतल्यावर पटकन ओळखू येतो. हा प्रीमियम दर्जेचा व सर्वाधिक किंमतीचा आंबा आहे.
“पायरी”, “रायवळ” हे रायगड, पालघर या जिल्ह्यात पिकतो या जिल्ह्यातील माती ही लाल व थोडी वालुकामय आहे. पायरी हा लवकर येणारा आंबा खूप रसाळ, पण थोडा आंबटसर गोड असतो. रायवळ हा चवदार पण टिकाऊ नसतो.
“तोतापुरी”, “लंगडा” ही आंब्याची जात नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यात पिकते. इथे काळसर गडद माती असल्यामुळे इथे पिकणारे आंबे हे चवीला गोडसर-तुरट आणि हा आंबा टिकाऊ पण फारसा सुगंधी नाही.
“केसर”, “बदामी” या जातीचे आंबे कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात पिकतात. इथली माती गडद काळसर व थोडी चिकणमाती मिश्रण अश्या प्रकारची आहे. केसर हा थोडा हापूससारखा रंग असणार आंबा आहे, पण सुगंध कमी असतो.बदामी हा आंबा बेंगलोर कडचा प्रभाव असलेला असा आंबा आहे. औरंगाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यात “कापरी”, “दशहरी” हा आंबा पिकतो. काळी माती मध्ये हा येतो.चव सौम्य असून टिकाऊ पण निर्यातीसाठी नाही फक्त स्थानिक बाजारपेठेत देवघेव होते.
सगळ्यांचा बापुस हापुसचं का ?
आता होते, आपल्या हिरोची एंट्री ‘हापूस’ जसे चांगले व्यक्तिमत्व घडण्यासाठी संस्कार महत्वाचे असतात. अगदी तसेच या हापूस वर कोकणातील लाल माती आपले विशेष संस्कार आईच्या माये सारखी करते. लोह मँगनीज हे सूक्ष्म पोषक द्रव म्हणून हापूस च्या वाढीस कारणीभूत ठरतात. हापूस आंब्याला मिळणारी खास केशरी रंगछटा आणि सुगंध यामागे जमिनीतील खनिज (लोह, मॅंगनीज) कारणीभूत आहेत. जांभा खडकातील सच्छिद्रता यामुळे पाण्याचे निस्सारन जलद घडते. तसेच झाडाची मुळे मुक्तपणे श्वास घेतात. झाडात गोडी, सुगंध निर्माण करणारे तेलकट घटक अधिक प्रमाणात तयार होतात. कोकणातील समुद्रावरून वाहणारे वारे दिवसा गरम आणि रात्रीच्या दमट हवेमुळे रस अधिक प्रमाणात तयार होतो. ह्याचा थेट परिणाम गोडी व सुगंधावर ही होतो. तसेच हापूस झाडे पुन्हा संकरित न केल्याने त्याच्या चव, गंध आणि रसात सातत्य टिकून आहे. बहुतेक वेळा ही झाडं नैसर्गिक पद्धतीने वाढवलेली असतात त्यामुळे आंब्याची गंधकणं (Aroma Compounds) फार उंच प्रतीची असतात. पारंपरिक बागायती व पिढ्यानपिढ्या जतन केलेली जात.म्हणून आज ही कोकणातील प्रीमियम दर्जेचा हापूस शो स्टॉपर आहे. तस म्हणल तर पोर्तुगीजानी एक काम चांगल केलयं ह्यो हापूस आंबा भारतात आणून आवो व्हय खरचं की हापूस आंबा म्हणजे त्यांच्या भाषेत (अल्फोन्सो) हा त्यांचीच देन हाय. आता बघा १५व्या-१६व्या शतकात पोर्तुगीज लोक भारतात आले, विशेषतः गोवा आणि कोकण किनारपट्टीवर त्यांनी वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी अनेक पाश्चिमात्य शेतीतंत्र आणि फळांचे प्रकार भारतात आणले, तसेच स्थानिक फळांची लागवड सुधारण्याचे तंत्रज्ञानही दिले.

“हापूस” आंब्याला आपण “अल्फोन्सो” म्हणतो. हे नाव पोर्तुगीज सरदार अफोंसो द आल्बुकर्क (Afonso de Albuquerque) यांच्या नावावरून पडले आहे. पोर्तुगीजांनी आंब्याच्या स्थानिक प्रजातींच्या संकरातून अधिक गोड, स्वादिष्ट आणि टिकाऊ प्रजाती विकसित केल्या. हापूस आंबा म्हणजे त्या काळात झालेल्या संकरणाचे फळ, ज्यामुळे त्याला विशेष सुवास, गोडसर चव आणि लोण्यासारखा पोत मिळाला. हापूस आंब्याचे मुख्य उत्पादन महाराष्ट्रातील रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, आणि कोकण भागात होते, जे पोर्तुगीज प्रभावाखाली होते.
हा फोटो पोर्तुगीज सरदार अफोंसो द आल्बुकर्क (Afonso de Albuquerque) यांचा आहे.
आता बघू आंब्यांच्या सम्राटाची कथा.व्हय व्हय खरंच आंब्यांचा सम्राट हाय आणि त्यो राहतोय जपान मध्ये त्याच नाव हाय “तायो नो तमांगो” (Taiyo no Tamago) तुम्हाला बी म्हणायला जड गेल का मग त्याला “सूर्याचा अंडा” म्हणू शकता. ते त्याच आपल्या भाषेतील नाव हाय आता या बाबा ला एवढा मान का तर आपल्यासारखच हाय याच बी जेच्याकडे पैसा जास्त त्याला मानपान बी जास्त प्रत्येक वर्षी जपानमध्ये लिलावात विक्री होते, आणि त्यात दोन आंब्यांच्या जोडीची किंमत 3000 ते 4000 अमेरिकी डॉलर्सपर्यंत जाते. आपल्या भारतीय रुपयांत ही किंमत होते सुमारे 2.5 लाख ते 3.5 लाख रुपये फक्त दोन आंब्यांसाठी !

तुम्ही म्हणाल एवढी ढीग किंमत द्यायला यात हाय काय एवढ अतिशय नियंत्रित शेती आंबा विशेष प्रकारे जाळ्यांत लटकवून वाढवला जातो. केवळ किंमतीमुळेच नव्हे, तर त्याच्या उच्च प्रतीच्या गुणवत्तेमुळे जगभर प्रसिद्ध आहे. त्याचे रंग आणि रूप गडद लालसर-सुनहरी रंग, जणू सूर्याची छटा ! आंब्याचा आकार अंड्यासारखा गोलसर, त्यामुळेच नाव “सूर्याचं अंड”. निवडताना प्रत्येक फळाचं वजन किमान 350 ग्रॅमपेक्षा जास्त असावं लागतं. काही फळं 500 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची असतात. त्याचा गोडवा किमान 15% पेक्षा अधिक असणं आवश्यक असते. त्यामुळे चव अतिशय गोड, मखमली आणि रसाळ असते. गराचा दर्जा (Pulp Quality) गर घट्ट, मधाळ तोंडात विरघळणारा, रेशमासारखा. कोणतीही तंतू (fibers) जाणवत नाहीत. त्याचा सुगंध अत्यंत सौम्य पण दीर्घकाळ टिकणारा सुगंध फळ फोडल्यावर लगेच दरवळतो. त्याला अगदी तळहातावरच्या फोडा सारखे वाढवले जाते. म्हंजे प्रत्येक आंबा विशेष जाळीमध्ये लटकवून झाडावरच परिपक्व केला जातो.
प्रत्येक झाडाला विशिष्ट प्रमाणात पाणी, प्रकाश, तापमान दिलं जातं. पूर्ण नैसर्गिक व रासायनांशिवाय उत्पादन घेतलं जातं. आणि लिलावात कुणाला बी घेत नाहीत. दर्जा नियंत्रण म्हंजे ग्रेडिंग सिस्टिम वजन, रंग, चव आणि गंध यावर काटेकोर तपासणी होते. फक्त उच्च दर्जाची 1% फळचं”तायो नो तमांगो” म्हणून वर्गीकृत होतात. म्हणूनच या सम्राटला लक्झरी गिफ्ट म्हणून ओळखतात.जपानमध्ये हा आंबा श्रीमंती व विशेष प्रसंगांसाठी गिफ्ट म्हणून वापरला जातो. मला तर प्रश्न पडतो एवढा महागडा आंबा घेतलाच तर खायचा की निस्त बघत बसायच.?
———- दिग्विजय रा.माळकर






