India has successfully test-fired its next-generation ballistic missile, 'Agni-Prime', from a rail-based mobile launcher system for the first time.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताने संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतरमध्य पल्ल्याच्या ‘अग्नी-प्राईम’ या नेक्स्ट जनरेशन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रेल्वेवर आधारित मोबाईल लाँचर प्रणाली वरून (Rail-based Mobile Launcher) पहिली यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.
या अभूतपूर्व कामगिरी नंतर भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चालत्या रेल्वे वरून कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या प्रगत राष्ट्रांच्या यादीत सामील झाला आहे.
२,००० किमी पल्ल्याची मारक क्षमता
‘अग्नी-प्राईम’ हे नवीन पिढीचे ( Next-Generation) क्षेपणास्त्र असून त्याची कमाल मारक क्षमता तब्बल २,००० किलोमीटर आहे. दोन-स्टेज सॉलिड इंधनावर चालणाऱ्या या क्षेपणास्त्रात कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टीम, अचूक मार्गदर्शन तंत्रज्ञान, तसेच वेगवान प्रतिसाद क्षमता (Quick Reaction Capability) यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) साठी विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची रचना आणि विकास DRDO ने केला आहे.
या चाचणीमध्ये वापरलेली स्पेशली डिझाईन केलेली रेल्वेवर आधारित मोबाईल लाँचर प्रणाली भारतासाठी एक मोठे सामरिक बळ ठरते. ही प्रणाली कोणत्याही पूर्वतयारी शिवाय देशभरातील रेल्वे नेटवर्कवरून सहजतेने हलवता येते. युद्धपरिस्थितीत अत्यल्प वेळेत आणि कमी दृश्यतेतून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची क्षमता शत्रूंसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
या प्रक्षेपणामुळे भारताने क्षेपणास्त्र प्रक्षेपणातील गुप्तता, गतिमानता आणि वेगवान प्रतिसाद या तिन्ही क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. आता भारत जमिनीवरील कोणत्याही ठिकाणावरून, रेल्वे नेटवर्कचा वापर करून, अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करू शकतो.
या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून DRDO, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, “ भारताने रेल्वेवर आधारित मोबाईल लाँचर प्रणाली वरून अंतरमध्य पल्ल्याच्या ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ही प्रणाली देशभर हलवता येऊ शकते आणि अत्यल्प वेळेत कमी दृश्यता राखून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची क्षमता देते. या कामगिरीमुळे चालत्या रेल्वेवरून कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टीम विकसित करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.”
या ऐतिहासिक यशामुळे भारताची सामरिक ताकद, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील संरक्षण क्षमतांना एक नवे बळ मिळाले आहे.