The city police have devised special measures for traffic to avoid traffic jams due to overcrowding in Kolhapur.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
नवरात्रौत्सव दरम्यान करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात दाखल होणार आहेत. गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलिसांनी वाहतुकीसाठी विशेष उपाययोजना आखल्या आहेत.
अवजड वाहनांना ‘नो एंट्री’
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. यात सीपीआर चौक, तोरस्कर चौक, गंगावेश, रंकाळा स्टँड, दसरा चौक यांचा समावेश आहे. अवजड वाहनांना शहराबाहेरील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केएमटी बस व रिक्षा सेवेत बदल
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील केएमटी बस थांबा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. बिंदू चौकाकडून छत्रपती शिवाजी चौकाकडे येणाऱ्या बसेस आता आईसाहेब महाराज पुतळा व स्वयंभू गणपती मंदिर चौकातून पुढे जातील. रिक्षा चालकांनी प्रवासी सोडण्यासाठी आझाद गल्ली कॉर्नर किंवा माळकर तिकटी परिसराचा वापर करावा. तसेच भवानी मंडप आणि माधुरी बेकरी समोरील रिक्षा थांबेही बंद असतील.
पार्किंगची व्यवस्था
दुचाकीधारकांसाठी ७ ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
रात्रीची पार्किंग (सायं. ६ ते १०) : एमएलजी हायस्कूल, मेन राजाराम हायस्कूल, महाद्वार रोड, बिंदू चौक सबजेल उजवी बाजू, गुजरी दोन्ही बाजू, मराठी बँक परिसर, करवीर पंचायत समिती पटांगण.
व्हीआयपी पार्किंग : विद्यापीठ हायस्कूलसमोरील पार्किंग व्हीआयपी वाहनांसाठी राखीव.
गारगोटी, कळंबा मार्गे : संभाजीनगर, नंगीवली चौक, लाड चौक, गांधी मैदान, ताराबाई हायस्कूल पटांगण.
राधानगरीकडून : क्रशर चौक, लाड चौक, गांधी मैदान पार्किंग.
कोकण, गगनबावडा मार्गे : रंकाळा, संध्यामठ परिसर.
शाहूवाडी कडून : शिवाजी पूल, दसरा चौक किंवा बिंदू चौक पार्किंग.
पोलिसांनी भाविकांना आवाहन केले आहे की, वाहतूक सूचनांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण वाहनं उभी करू नयेत आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाला सहकार्य करावे, जेणेकरून देवीदर्शनाचा उत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पडेल.