श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरू आणि त्यांचे गुण

दत्त जयंती विशेष गुरूंची शब्दसेवा : अध्याय 2

0
38
Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क :



यदुअवधूत संवाद : भगवान श्रीकृष्णांनी आपले अवतारकार्य संपविण्याचा मानस उद्धवाला सांगितला व त्यावर उद्धवाने मला ज्ञान सांगावे अशी विनंती केली. तेव्हा माझा पूर्वज यदू याला अवधूतरूपात श्री दत्तात्रेयाने मी २४ गुरूंपासून घेतले ते ज्ञान तुला सांगतो असे म्हणत हे ज्ञान सांगितले.

त्या त्या गुरूचे गुण व त्यापासून घेतलेला बोध हे सर्व उद्धवाला सांगितले. सदर उपदेशाचा श्रीमद्भागवत पुराणात अकराव्या स्कंधात अध्याय सात ते नऊमध्ये उल्लेख आलेला आहे. प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित दत्तमहात्म्यातही याचा उल्लेख आढळतो. ‘जो जो म्या जयाचा घेतला गुण तो तो म्या तया गुरू केला जाण’ याप्रमाणे व्यक्ती, वस्तु, पंचमहाभुते, प्राणी, पक्षी यासर्वांकडून श्रीदत्तगुरूंनी गुण ग्रहण करून त्यांना गुरू केले. सर्वच गोष्टी भक्तांना अभ्यास करण्याजोग्या आहेत. 
१)पृथ्वी.
पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेण्यासारखा आहे. कारण पृथ्वी सर्व प्राणिमात्रांचे आश्रय स्थान असून कितीही आघात झाले तरी मातेप्रमाणे त्या सर्वांचा सांभाळ करते. खोदणे, नांगरणे, कचरा, घाण यांसारखे आघात साहून सर्व प्राणिमात्र व वृक्षसंपत्ती यांचे पोषण करते.
पृथ्वीचेच अंग वृक्ष हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. मुळापासून शेंड्यापर्यंत फळे, फुले देऊन सर्वांना सुखी करतात. ते वाळून गेल्यावरही त्याचा उपयोग होतो. परोपकाराय तिष्ठंति वृक्षा: । परोपकाराय इदं शरीरम् । त्याप्रमाणे मनुष्याने आपल्या देहाचा परोपकारासाठी उपयोग करावा.
पृथ्वीचा अंग असलेले पर्वत हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्यामध्ये असलेल्या सर्व खनिज संपत्तीचा उपयोग परोपकारार्थच करतात. त्याचप्रमाणे साधु-संन्यासी यांना आश्रय देतात. याप्रमाणे मनुष्यानेही संग्रही असलेल्या विद्यांचा परोपकारासाठी उपयोग करावा.
२) वायू.
वायू दोन प्रकारचे. शरीरातील प्राणवायूमुळे मनुष्याचे जीवन चालते. म्हणून आहार प्राणवायू चालण्यापुरताच घ्यावा. दुसरा वायू बाहेरचा. हा कुठेही आसक्त होत नाही. सुगंध दुर्गंध (पृथ्वीचा गुण) दूर करून पवित्र होऊन राहतो, म्हणून संतोष, पवित्रता व अनासक्ती हे गुण वायूपासून घ्यावे.
३) आकाश.
आकाश सर्वत्र आहे. याची मर्यादा आजपर्यंत कळली नाही. ही चराचर सृष्टी आकाशात राहते. त्याचप्रमाणे आत्माही सर्वव्यापक आहे. शरीरे भिन्न असली तरी देहामध्ये वास करणारा किंवा बाहेर असलेला आत्मा एकच अखंड स्वरूपाचा आहे. या सृष्टीत कितीही बदल झाले तरी आकाश निर्विकार राहते.
४) जल (उदक).
जलावरच सर्व जीवन अवलंबून आहे. जल स्वभावत: स्वच्छ, पवित्र, मधुर व समसमान असते. त्याचप्रमाणे सर्वांशी आपले संबंध मधुरपणे ठेवावे, कुणाच्याही दोषाकडे लक्ष ठेवू नये. जलाप्रमणे शिक्षण घेऊन वर्तन करणाऱ्या मनुष्याच्या दर्शनाने सर्वांना पवित्रता येते.
५) अग्नी.
अग्नीला आकार नाही. जळणाऱ्या वस्तूचा आकार त्याला येतो. पूर्णपणे वस्तू जळल्यावर तो गुप्त होतो. कोणत्याही वस्तूचा संग्रह तो करीत नाही. तेजस्वीपणा त्याचा प्रख्यात आहे. अग्नीच्या ज्वाला क्षणभंगूर आहेत. तसेच मनुष्याचे जीवनही क्षणभंगूर आहे. आपण असेपर्यंत ह्या देहाचा सदुपयोग करून घ्यावा, अर्थात मोक्षप्राप्ती करता.
६) चंद्र.
चंद्रावरील कला वाढत असतात. पौर्णिमेला पूर्णचंद्र दिसतो. पुढे कला कमी कमी होऊन अमावस्येला पूर्णपणे दिसेनासा होतो. हे सर्व सूर्याच्या प्रकाशातील भागामुळे होते. चंद्र जसाचा तसाच असतो. त्याप्रमाणे शरीरावर बालपणापासून मृत्यूपर्यंत भिन्न भिन्न अवस्था येतात. पण ही फक्त शरीरावस्था असते. आत्मा हा जसाचा तसाच असतो.
७)सूर्य.
सूर्य समुद्रातील पाण्याची वाफ करून यथायोग्य काळी वर्षा करून सर्व वृक्ष, प्राणी व मनुष्य यांना सुखी करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने परोपकार बुद्धीने कर्म करावे. पण त्यात आसक्त होऊ नये.
८) कपोत पक्षी (कबुतर).
कपोत पक्षी व कपोतीण एका घरट्यात प्रेमाने व आनंदात राहत होते. पुढे त्यांना पिल्ले होऊन त्यांना पंख फुटल्यावर ती बाहेर जाऊ लागली पण ती एकदा पारध्याच्या जाळ्यात अडकली. त्यांना सोडवायला गेलेली कपोती तीही अडकली. पुढे कपोतही अडकला. याप्रमाणे सर्वच जाळ्यात सापडले. तसेच मनुष्याने केवळ आपल्या कुटुंबातच मग्न होऊ नये. हे शरीर मोक्षद्वार असल्यामुळे योग्यवेळी संसाराचा मोहत्याग करावा.
९) अजगर.
आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात. निर्वाहाकरिता कधी मिळेल, कधी मिळणार नाही अशा अवस्थेत अजगराप्रमाणे निश्चिंतपणे आपला जीवनयोग करीत राहावे.
१०) समुद्र.
समुद्रात सर्व नद्या पाणी घेऊन येतात. अथांग आहे तरी आपली मर्यादा सोडीत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने खूप प्राप्ती झाली तरी खूप प्रफुल्लीत होऊ नये. आपल्या ध्येयाकडे सतत लक्ष ठेवावे.
११) पतंग.
दिव्याच्या ज्योतीच्या रूपावर भाळून पतंग स्वत:ला जाळून घेतो. त्याचप्रमाणे परस्त्रीच्या  रूपावर भाळून आपला नाश करू नये. संयम राखावा.
१२) भृंग.
निरनिराळ्या फुलांवरून भृंग मकरंद सेवन करतो. त्याप्रमाणे लहान – मोठ्या सगळ्या ग्रंथांचे सार लक्षात ठेवावे, व त्याप्रमाणे आचरण असावे.
१३) मातंग.
मातंग म्हणजे हत्ती. हा बलवान, बुद्धिवान व आकारानेही मोठा आहे. पण त्याला पकडण्याकरता मोठ्या खड्ड्यात नकली हत्तीण करून त्याला आकर्षित करतात व तो खड्ड्यात पडतो. मग त्याला पकडतात. या वरून आपण भौतिक गोष्टींच्या   मोहात पडू नये हे शिक्षण मिळते.
१४) मधुमाशी.
मधुमाश्या फुलांवर जाऊन मध गोळा करतात व ते पोळ्यात जमा करतात. परंतु त्या पोळ्याला आग लावून मनुष्य ते पोळे मधासाठी हस्तगत करतो. म्हणून धनाचा संग्रह करणाऱ्या लोकांची अशीच गत होते. दरोडे – डाके पडून प्राणहानीही होते. म्हणून धनाचा संग्रह वर्ज्य करावा.
१५) मृग.
हरिण हे चपळपणासाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याला पकडण्यासाठी पारधी लोक बासरीसारखे वाद्य वाजवून त्याला स्थिर करतात व नंतर त्यावर जाळे टाकून त्याला पकडतात. म्हणून ग्रामगीते म्हणजे श्रृंगारिक लावण्या वगैरे श्रवण करू नये. भगवंताच्या गुणगानाचेच श्रवण करावे.
१६) मत्स्य.
मत्स्य पकडण्यासाठी पद्धती म्हणजे एका दोरीला गळ लावतात. त्याला खाद्य म्हणून मासांचा तुकडा लावतात. दोरी काठीला बांधून ती पाण्यात सोडतात. माशाने ते तोंडाने धरताच त्याच्या टाळूला गळ अडकून पडतो व तो प्राणास मुकतो. म्हणून भोज्य पदार्थांच्या आवडीवर रसांवर (जीभ) ताब्यात ठेवावी.
१७) पिंगला.
विदेह नगरामध्ये एक पिंगला नावाची सुंदर देखणी वेश्या राहत होती. धनाच्या लोभामुळे तिच्याकडील पुरुषांचे येणे पुढे बंद झाले. एके दिवशी घरात- बाहेर येणे- जाणे सुरू होते. तरी कुणीही पुरूष तिच्याकडे आला नाही. तेव्हा तिला एकदम आपल्या व्यवसायावर उपरती / वैराग्य प्राप्त झाले व पुढे ती आत्मानंदात राहू लागली. निव्वळ आशेवर जगू नये. त्यामुळे दु:ख प्राप्त होते. परंतु वैराग्य आल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही.
१८)कुरर पक्षी.
याला टिटवी म्हणतात. हे मांसभक्षी पक्षी आहेत. असाच एकदा मासाचा गोळा प्राप्त झाल्यावर तो सर्व पक्ष्यांनी सारखा वाटून घेतला. काही पक्ष्यांनी लवकर खाऊन संपविला पण एक पक्षी हळूहळू खात होता. त्याच्याजवळ बरेच मांस उरले म्हणून बाकीचे पक्षी त्या पक्ष्यावर मांस खाण्यासाठी तुटून पडले. जेव्हा त्या पक्ष्याने मांसाचा तुकडा फेकून दिला त्यानंतर त्याला कोणीही त्रास दिला नाही. तात्पर्य असे की परिग्रह (संग्रह) हा दु:खाला कारणीभूत होतो म्हणून धनादिकाचा संग्रह करू नये.
१९) बालक.
लहान बालक कोणतीही चिंता न करता आपल्या आनंदात मग्न असते. मान-अपमान, पाप-पुण्य इ. चिंता त्याला असतात. ते आपल्या आनंदात क्रीडा करीत राहते. ती त्याची अंतर्वृत्ती आहे. याप्रमाणे मनुष्याला अंतर्वृत्तीने सुख मिळते हे शिक्षण बालकाला गुरू करून मला मिळाले.
२०) कुमारी कंकण.
एका उपवर मुलीला पाहण्याकरता काही पाहुणे तिच्या घरी आले. त्यावेळी घरचे सर्व लोक बाहेर गेले होते व तिला गायीसाठी म्हणून घरीच ठेवले होते. ऐनवेळी त्यांच्या जेवणाची सोय करावी म्हणून तिने साळी कुटण्यास घेतली. परंतु तिच्या कंकणांचा आवाज होऊ लागला. त्या आवाजाचे मात्या-पित्यांना दूषण येईल म्हणून एक-एक कंकण काढत गेली. जेव्हा एकच कंकण राहिले तेव्हा आवाज बंद झाला म्हणून कोणत्याही साधनेसाठी एकांतच असावा हे शिक्षण मला मिळाले.
२१) सर्प.
सर्प हा समूहाने राहत नाही. ते एकटेच फिरतात. त्यांना दुखावल्याशिवाय कोणाला डंख करीत नाही. त्याप्रमाणे संन्याशाने सतत फिरत राहावे. पण मठ, आश्रम बांधू नये.
२२) शरकार.
शरकार म्हणजे बाण बनविणारा लोहार. हा बाण बनविण्याच्या वेळी कोणत्याही दुसऱ्या आवाजाकडे लक्ष देत नाही. जवळून राजाची मिरवणूक गेली तरी त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या कामात एकाग्रता ठेवावी. जप, तप, योग साधन इ. करणाऱ्यांना अशी एकाग्रता आवश्यक आहे. हे शिक्षण मला शरकाराकडून मिळाले.
२३) कुंभारीण माशी.
ही माशी पावसाळ्यात एका अळीला आपल्या घरट्यात आणून ठेवते. त्या अळीला प्रत्येक वेळी जाता – येता तिच्याजवळ असलेल्या काट्याचा डंख करणाऱ्या माशीतच असते. पुढे समयानुसार त्या अळीला डंख करीत असलेल्या जागी नवा काटा निघतो व ती अळी कुंभारीण माशी बनते. तात्पर्य ज्याचे आपण नित्य ध्यान करू त्यातच आपले रूपांतर होईल (हा किटकन्याय म्हणून ब्रह्मचिंतनात प्रसिद्ध आहे)
२४) कोळी.
हा आपल्या नाभीतून सूत्र काढून त्याचे जाळे बनवितो. त्यात तो यथेच्छ क्रीडा करून ते जाळे स्वत:मध्ये सामावून घेतो. त्याप्रमाणेच ईश्वरही हे जग निर्माण करतो व यथाकाळ राहून आपल्यामधे सामावून घेतो. त्याला बाहेरची आणखी सामग्री लागत नाही. नरदेह प्राप्त झाल्यावर या जन्मात जे लोक मोक्ष साधन करून घेत नाही त्यांचा पुनर्जन्म होत राहतो.
अशाप्रकारे यदूला श्रीदत्तात्रेयांनी ज्ञान सांगून कृतार्थ केले, तेच ज्ञान मी तुला सांगितले, असे श्रीभगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here