प्रसारमाध्यम डेस्क :
भारतीय अध्यात्मपरंपरेत मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. याच दिवशी, मृग नक्षत्रावर, सायंकाळी श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्री दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र, कर्नाटकमधील दत्तक्षेत्रे, तसेच भारतातील विविध संप्रदायांत हा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा होतो.

दत्तजयंतीचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व
प्राचीन काळात भूतलावर आसुरी शक्तींचा प्रचंड प्रभाव वाढला होता. देवगणांचे विविध प्रयत्न असफल झाल्यानंतर ब्रह्मदेवाच्या आदेशाने देवत्रयींना (ब्रह्मा–विष्णू–महेश) विविध स्वरूपांत अवतार घ्यावे लागले. याच अनुषंगाने दत्तदेवतेला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला. त्यांच्या अवतारकार्यामुळे दैत्यांचा नाश होऊन पृथ्वीवर पुन्हा संतुलन येऊ शकले.
दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्त्व पृथ्वीतलावर नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते असे मानले जाते. या दिवशी मनोभावे उपासना केल्यास भक्तांना अध्यात्मिक उन्नती, शांतता आणि कृपाकटीवर संरक्षण मिळते.
उत्सव साजरा करण्यातील परंपरा
दत्तजयंतीसाठी शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी उल्लेखात नसला, तरी दीर्घकाळापासून समाजात काही प्रथा प्रचलित आहेत :
गुरुचरित्र सप्ताह: उत्सवापूर्वी सात दिवस ‘श्री गुरुचरित्र’ या ग्रंथाचे पारायण केले जाते. या पारायणाला ‘गुरुचरित्र सप्ताह’ असे म्हणतात.
मंदिरोत्सव : औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, माहूर अशा प्रसिद्ध दत्तक्षेत्रांत हजारो भक्तांची गर्दी होते.
भजन, कीर्तन, दत्तयज्ञ, महाप्रसाद, पालखी सोहळे, रथोत्सव असे अनेक कार्यक्रम दिवसभर चालतात.
पूजा, आरती आणि प्रसाद: दत्तगुरूंची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा केली जाते. सुंठवडा (खोबरे, गूळ, सुकामेवा व आल्याचा मिश्रण) हा प्रसाद दिला जातो.
श्री दत्तात्रेयांची प्रतीके
कमंडलू व जपमाळ – ब्रह्मदेवाचे प्रतीक
शंख व चक्र – विष्णूचे प्रतीक
त्रिशूळ व डमरू – शंकराचे प्रतीक
गाय (पाठीमागे) – पृथ्वीमातेचे प्रतीक
चार श्वान – चार वेदांचे प्रतिनिधित्व
श्री दत्तांची अलौकिक भ्रमंती
श्रीदत्तगुरू एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसत असत. त्यांचे स्थूल रूप एका ठिकाणी दिसले, तर सूक्ष्म रूप जगभर भ्रमण करत असे. त्यांच्या भ्रमंतीविषयी लोककथांमध्ये वर्णन आहे :
वाराणसी – स्नान
प्रयाग – चंदन उटी
कोल्हापूर – भिक्षा
पांचाळेश्वर (गोदावरी पात्र) – दुपारचे भोजन
राक्षसभुवन (बीड) – तांबूलभक्षण
नैमिषारण्य – प्रवचन
माहूर – निद्रा
गिरनार – योग
त्यांच्या लीलांमध्ये श्रीकृष्णांच्या लीलांचे प्रतिबिंब दिसते.
समाजातील श्री दत्तांची उपासना : संप्रदाय परंपरा
भारतामध्ये शैव, वैष्णव, शाक्त तसेच अनेक संप्रदाय दत्तात्रयांची भक्ती करतात. महाराष्ट्रात दत्त आराधना विशेष तेजस्वी परंपरा म्हणून ओळखली जाते.
दत्तजयंती हा केवळ उत्सव नसून, तीन देवांच्या एकत्रित तत्त्वाचे स्मरण आहे. त्रिगुणात्मक शक्ती, त्रिविध ज्ञान आणि त्रिदेवांचे सूक्ष्म तत्त्व दत्तात प्रकट होते. त्यांच्या जन्मदिवशी सत्संग,गुरुचरित्र पारायण,दत्त नामस्मरण,भजन–कीर्तन, दान–धर्म याने मन शुद्ध होते, अहंकार निवळतो आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो.
श्रीदत्तात्रेय हे ज्ञान, वैराग्य, योग आणि भक्ती यांचे अद्वितीय संगम आहेत. त्यांच्या उपासनेने मनातील द्वंद्व नाहीसे होऊन जीवन सुगंधित होते. दत्तजयंतीचा दिवस आपण सर्वांनी आत्मशुद्धी, गुरुकृपा आणि आध्यात्मिक विचारांची वाटचाल यासाठी उपयोगात आणावा.
।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।






