सारंगखेडा यात्रा : अश्वशौकिनांसाठी एक मोठी पर्वणी !

0
29
Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क : 

 

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे अश्वशौकिनांसाठी एक मोठी पर्वणी असलेल्या ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला नुकताच प्रारंभ झाला आहे. अठराव्या शतकापासून, म्हणजेच जवळपास चारशे वर्षांहून अधिक काळापासून ही यात्रा अविरतपणे सुरू आहे. तापी नदीच्या काठावर वसलेल्या सारंगखेडा येथील या यात्रेसाठी देशभरातून विविध जातींचे आणि उम्दे घोडे दाखल होत असतात. यामध्ये प्रामुख्याने मारवाडी, काठियावाडी, नुकरा आणि पंजाबी यांसारख्या जातिवंत घोड्यांचा समावेश असतो.

भारतातील सर्वात मोठ्या अश्व बाजारांपैकी एक म्हणून या यात्रेची ओळख आहे. या यात्रेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथे आयोजित होणारा चेतक महोत्सव. गेल्या अनेक वर्षांपासून चेतक महोत्सवाच्या माध्यमातून घोड्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमुळे घोड्यांची गुणवत्ता, वैशिष्ट्ये आणि त्यांची खरी किंमत निश्चित होण्यास मदत होते. देशभरातून अश्वप्रेमी आणि अश्वशौकीन या स्पर्धा पाहण्यासाठी आणि घोड्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी सारंगखेडा येथे दाखल होतात. घोड्यांना पाहण्याचा आणि त्यांच्या सौंदर्याचा आनंद लुटण्याचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण इथे येतात.

सारंगखेडा यात्रेचा इतिहास अतिशय समृद्ध आहे. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबरोबर जोडला गेलेला आहे. यामुळे या यात्रेचे महत्त्व आणखी वाढते. दत्त जयंतीपासून या यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर घोडे व अश्वप्रेमी या ठिकाणी येत असतात. ही यात्रा केवळ घोडे खरेदी-विक्रीचे केंद्र नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे. नंदुरबार येथे होणारी ही यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील अश्व बाजार फक्त महाराष्ट्रच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. यंदाही येथील बाजारात विविध राज्यांतून अश्व विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे सुपुत्र आदित्य कुल यांचेही अश्वप्रेम यावेळी पाहावयास मिळाले. आदित्य कुल यांनी येथील अश्व बाजारातून 11 लाख 11 हजार 111 रुपये किमतीची नुकरा जातीची घोडी खरेदी केली. या अश्व बाजारात दरवर्षी अनेक सेलिब्रिटी घोडे खरेदीसाठी येत असतात.

जातिवंत आणि उमद्या घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील अश्व बाजार विविध प्रांतातील घोड्यांच्या आगमनाने बहरला आहे. घोडे बाजारात सुमारे 1800 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आतापर्यंत घोड्यांच्या विक्रीतून 50 लाखांहून अधिक उलाढाल झाली आहे. असे असले तरी युवराज, सुलतान, रुबी आणि मानसी या अश्वांची चर्चा असून अश्व शौकीन त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
भरतपूर (राजस्थान) येथील कृष्णवीरसिंग राजपूत यांच्या मालकीची २० महिने वयाची नुकरा जातीची घोडी दौंडचे आमदार राहुल कुल यांचे पुत्र आदित्य यांनी 11 लाख 11 हजार 111 रुपयांमध्ये खरेदी केली. आदित्य हे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज येथील लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. अश्वांची आवड असल्याने खरेदी केल्याचे आदित्य यांनी सांगितले. मागील वर्षीही सारंगखेडा येथे एका घोड्याची खरेदी त्यांनी केली होती.


नुकरा जातीच्या अश्वाची वैशिष्ट्यं काय?
नुकरा ही घोड्यांची एक प्रसिद्ध आणि मौल्यवान जात मानली जाते. हे घोडे त्यांच्या रुबाबदार आणि उंच बांध्यासाठी ओळखले जातात. या घोड्यांची किंमत लाखांपासून कोट्यवधींच्या घरात असू शकते. त्यांना बाजारात खूप मागणी असते. नुकरा घोडे हे त्यांच्या उत्कृष्ट गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत.

या अश्व बाजाराची  ऐतिहासिक नोंदी सुद्धा आहेत. 
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा हे गाव तापी नदीकाठी वसलेले आहे. येथील एकमुखी दत्ताचे मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या भरणाऱ्या यात्रा उत्सवाला जवळपास साडेतीनशे  वर्षांची परंपरा आहे. येथील अश्व बाजार देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. भारतातील पुष्करनंतर येथील अश्व बाजाराची मोठ्या प्रमाणावर गणना होते.

या अश्व बाजाराबाबत अनेक पुरातन नोंदी आढळून येतात. इतिहास काळात श्री महाराणा प्रताप, श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री संभाजी महाराज यांनीही येथून घोडे खरेदी केल्याचे बोलले जाते. छत्रपती संभाजी महाराजांनी युद्ध काळात मुघलांशी लढताना या परिसरात तापीकाठी वास्तव्य केले असल्याची नोंद आहे. या ऐतिहासिक घोडेबाजारात घोडे खरेदी केल्याचीही नोंद आहे. याचा दाखला छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून देण्यात आला आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here