अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विविध विषयांतील साहित्यिकांची निवड होत असताना अनुवाद क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश अद्याप न झाल्याची खंत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. साहित्याच्या व्यापकतेसाठी आणि अनुवाद क्षेत्राला योग्य तो सन्मान मिळावा यासाठी त्यांनी सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांचे नाव सूचविले.
रविंद्र गुर्जर – आतापर्यंत कथा, कादंबरी, कविता, दलित, ग्रामीण, विज्ञान तसेच विनोदी, वैचारिक, ऐतिहासिक अशा विविध साहित्यप्रकारांतील लेखकांची अध्यक्षपदी निवड झाली आहे; परंतु लेखकाइतकीच अनुवादकाची भूमिका महत्त्वाची असतानाही एकाही अनुवादकाला आजवर ही संधी मिळालेली नाही. गेल्या ५० वर्षांत अनुवादित साहित्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जागतिकीकरणाच्या पुढील टप्प्यात भाषांतर ही प्रक्रिया भाषा व साहित्याच्या आदानप्रदानासाठी अधिक आवश्यक ठरणार आहे. ग्रंथालयांमध्येही वाचकांची पसंती अनुवादित ग्रंथांनाच मिळताना दिसते. अनुवादकाच्या कामामुळेच साहित्यप्रभा आणि लेखन उजळून निघते.”
पत्रकार परिषदेला स्वतः चंद्रकांत भोंजाळ उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा गौरव करत गुर्जर म्हणाले, “ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भोंजाळ यांनी लेखनाचे विविध प्रकार हाताळले आहेत. आकाशवाणी, दूरशिक्षण, पत्रकारिता, नाट्य-चित्रपट, संपादन अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या सुमारे ७५ पुस्तकांची प्रकाशने झाली असून, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील ६० पुस्तकांचे मराठीत अनुवाद त्यांनी केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडीला पाठिंबा मिळावा.”
यासोबतच महाराष्ट्रातील अनुवादक संघासह विविध संस्था, वाचनालयांनी आणि माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी भोंजाळ यांच्या नावाला पाठिंबा दर्शविल्याची माहिती गुर्जर यांनी दिली. मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे; शब्दसृष्टी, नवी मुंबई; शहादा नगरपंचायत संचालित पूज्य साने गुरुजी वाचनालय, शहादा; अहिल्यानगर जिल्हा वाचनालय, अहिल्यानगर; दादर सार्वजनिक वाचनालय, दादर; व. वा. जिल्हा वाचनालय, जळगाव; तसेच कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, मालगुंड यांसह अनेक संस्थांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाला पत्र लिहून अनुवादक भोंजाळ यांची अध्यक्षपदी निवड करावी, अशी विनंती केली आहे.
साहित्य क्षेत्रात अनुवादकाचा आवाज ऐकू जावा आणि त्यांच्या योगदानाला मान मिळावा यासाठी हा पाठिंबा आणि पुढाकार महत्त्वाचा ठरणार असल्याचे गुर्जर यांनी सांगितले.