एक ऑगस्टपासून सुरू होणार ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’

3.5 कोटी रोजगारांचं लक्ष्य, तरुणांसाठी सुवर्णसंधी !

0
206
Google search engine

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

देशातील तरुणांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने बेरोजगारीवर मात करण्यासाठी ‘ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ (PMVBRY) लागू करण्याची घोषणा केली असून, ही योजना १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. ३१ जुलै २०२७ पर्यंत चालणाऱ्या या योजनेसाठी ९९,४४६ कोटी रुपयांचं बजेट निश्चित करण्यात आलं आहे. सरकारचं उद्दिष्ट पुढील दोन वर्षांत ३.५ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचं आहे.
दोन मुख्य भागांची योजना
ही योजना दोन भागांमध्ये विभागलेली आहे.  एक भाग नवीन कर्मचाऱ्यांसाठी, तर दुसरा नियोक्त्यांसाठी आहे.
पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांसाठी विशेष फायदा
जर एखादी व्यक्ती पहिल्यांदाच नोकरी करत असेल आणि तिचा पगार दरमहा १ लाख रुपयांपर्यंत असेल, तसेच ती EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) नोंदणीकृत असेल, तर त्याला / तिला १५,००० रुपयांपर्यंतची प्रोत्साहन मदत मिळणार आहे.
ही रक्कम दोन हप्त्यांत दिली जाईल 
  • पहिला हप्ता – नोकरीच्या सहा महिन्यांनंतर
  • दुसरा हप्ता – बार महिन्यांनंतर, तसेच आर्थिक साक्षरतेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर.
  • या रकमेपैकी काही भाग थेट कर्मचाऱ्याच्या बचत खात्यात जमा केला जाईल, ज्यामुळे आर्थिक सुरक्षाही सुनिश्चित होईल.
  • या लाभाचा अंदाजे १.९२ कोटी नव्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असा अंदाज आहे.
नियोक्त्यांसाठी प्रोत्साहन
जर एखाद्या कंपनीने नव्या कर्मचाऱ्यांना नोकरी दिली, तर सरकार दरमहा ३,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम कंपनीला देईल.
  • ही मदत दोन वर्षांसाठी मिळेल, मात्र जर कंपनी उत्पादन क्षेत्रात असेल, तर ही मदत ४ वर्षांपर्यंत दिली जाईल.
  • कंपनीने किमान : २ नवीन कर्मचारी नियुक्त करणे बंधनकारक आहे (५० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांसाठी)
  • पाच नवीन कर्मचारी नियुक्त करणे बंधनकारक आहे (५० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांसाठी)
  • या कर्मचाऱ्यांना किमान सहा महिने नोकरीवर ठेवणं अनिवार्य आहे.
आमच्या यू ट्यूब चॅनेललाही भेट द्या….👇

योजनेचे वैशिष्ट्ये
  • सर्व क्षेत्रांमध्ये लागू, परंतु उत्पादन क्षेत्राला विशेष प्रोत्साहन
  • DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने रक्कम जमा :
    • कर्मचाऱ्यांसाठी – आधारशी जोडलेल्या खात्यावर
    • नियोक्त्यांसाठी – पॅनशी जोडलेल्या खात्यावर
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मजबूत प्रणालींचा वापर करून गैरवापर रोखण्याची हमी
या योजनेद्वारे सरकार रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार असून, देशातील तरुणांना औपचारिक रोजगारात सामावून घेण्याचा आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. ही योजना केवळ बेरोजगारी दूर करण्यासाठी नव्हे, तर स्वावलंबी आणि विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.

—————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here