प्रसारमाध्यम l दिग्विजय रा.माळकर
देशातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी Pradhan Mantri Kisan Samman Nidhi योजना ही सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण योजनांपैकी एक आहे, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये, तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात, मात्र २२ व्या हप्त्यापूर्वी काही नियम कडक करण्यात आल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
मागील २१ व्या हप्त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकले होते, यावेळीही ई-केवायसी, जमीन नोंदी, आधार लिंकिंग या कारणांमुळे २,००० रुपयांचा पुढील हप्ता थांबू शकतो.
जमीन नावावर नसल्यास लाभ नाही
या योजनेचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जमीन धारकत्व, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती जमीन नोंदणीकृत आहे त्यांनाच लाभ मिळतो, जर एखादा शेतकरी भाडेपट्ट्यावर किंवा शेअर पद्धतीने शेती करत असेल पण जमीन त्याच्या नावावर नसेल तर तो अपात्र ठरतो,
राज्य सरकारच्या जमीन नोंदींची पडताळणी केंद्र सरकारच्या डेटाशी केली जाते, माहिती अपूर्ण, चुकीची किंवा अद्ययावत नसल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो, काही राज्यांमध्ये शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
ई-केवायसी पूर्ण न केल्यास हप्ता अडकणार
सरकारने ई-केवायसी सक्तीची केली आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचा २२ वा हप्ता थांबू शकतो,
ई-केवायसी प्रक्रिया अधिकृत पोर्टल किंवा मोबाईल अॅपवरून ओटीपीद्वारे पूर्ण करता येते, काही प्रकरणांमध्ये बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक असते,
आधारमध्ये नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर चुकीचा असल्यास अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे सर्व माहिती त्वरित तपासून दुरुस्त करणे गरजेचे आहे.
आधार लिंक बँक खाते अनिवार्य
PM किसानचा हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जातो, त्यामुळे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, NPCI मॅपिंग अपडेट नसल्यास व्यवहार फेल होऊ शकतो,
नावातील स्पेलिंग चूक, जन्मतारीख जुळत नसणे, चुकीचा खाते क्रमांक यामुळेही पेमेंट अडकू शकते, मागील हप्त्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना याच कारणामुळे विलंबाचा सामना करावा लागला होता.
२२ व्या हप्त्याची संभाव्य तारीख
२२ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी माध्यमांतील वृत्तांनुसार होळीपूर्वी निधी जमा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी, जमीन नोंदी, आधार लिंकिंग आणि बँक तपशील तपासून घ्यावेत, अन्यथा छोट्या चुकीमुळेही २,००० रुपयांचा हप्ता थांबू शकतो.





