कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र शासनाच्या पी.एम. किसान योजनेचा माहे एप्रिल, २०२५ ते जून २०२५ या कालावधीतील २० वा हप्ता माहे जून मध्ये वितरीत होणार असून विविध त्रुटींच्या पूर्तते अभावी सुमारे २२ हजार २७८ लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यासाठी जिल्ह्यात दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतक-यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सिडिंग करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबीची पूर्तता करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत असून प्रती हप्ता प्रती लाभार्थी दोन हजार रुपये या प्रमाणे आज अखेर १८ हप्त्याचा लाभ वितरीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ६ हजार ३७१ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण (e-kyc) प्रलंबित असून त्यांनी पी. एम. किसान मोबाईल ॲपमधून चेहरा स्कॅन करावा किंवा अंगठा स्कॅन करुन बायोमेट्रिक पद्धतीने ekyc करावी किंवा महा ई-सेवा केंद्र / आपले गावचा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.
४२९ लाभार्थ्यांची नव्याने नोंदणी करायची असून त्यांनी चालू ७/१२, फेरफार, पती- पत्नी आधार कार्ड, वारस नोंद असल्यास फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीनधारणा असलेला फेरफार पोर्टल वर अपलोड करावा किंवा महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा. ११ हजार ६१९ लाभार्थ्यांचे बँक आधार सिडिंग करायचे असून बँक शाखेशी संपर्क करून आपले अद्यावत असलेले आधार कार्ड बँक खाती संलग्न करुन घ्यावे किंवा नजिकच्या पोस्टात डीबीटी असलेले खाते उघडावे किंवा बँक शाखा / पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.
१ हजार ३६६ नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पहिल्या ते पाचव्या हप्त्याच्या वेळी UID Disabled व Bank Failure Transaction मुळे लाभ अदा न होऊ शकलेले लाभार्थी बँक शाखेशी संपर्क करून आपले अद्ययावत असलेले आधार कार्ड बँक खाती संलग्न करून घ्यावे किंवा नजीकच्या पोस्टात DBT enbled असलेले खाते उघडावे अथवा बँक शाखा / पोस्ट ऑफिस संपर्क साधावा.
पी. एम. किसान योजने अंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, भूमिअभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे.
केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा २० हप्ता माहे जून २०२५ मध्ये वितरीत होणार असून त्यापूर्वी प्रलंबित बाबीची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. यास्तव या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता मोहिमे दरम्यान करावी तसेच अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी /तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
—————————————————————————————————